सिंधुदुर्गमध्ये जाणवताहेत उष्म्याचे चटके : आणखी दोन दिवस हीच स्थिती : मुळदेतील उद्यानविद्या महाविद्यालयाचे : शास्त्रज्ञ डॉ. मुठाळ यांनी दिली माहिती
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
हवेतील आद्रतेत 15 ते 20 टक्क्यांनी घट झाल्याने जिल्हय़ात गेल्या दोन दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात ‘उन्हाळा’ जाणवू लागला आहे. जिल्हय़ातील तापमान सरासरी 38 ते 39 डिग्रीपर्यंत असून आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्याने हवेतील थंडावा गायब झाला आहे. सद्यस्थितीत प्राप्त माहितीनुसार, ही स्थिती 22 एप्रिलपर्यंत म्हणजे पुढील दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत लागवडयोग्य फळरोपे तसेच यावर्षी लागवड केलेल्या रोपांच्या मरण्याचे प्रमाण वाढू शकते. आंब्याची फळगळ तसेच अशा वातावरणामुळे आंब्यात साका होण्याचे प्रमाण वाढू शकते, असे उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदेचे ग्रामीण कृषी सेवा शास्त्रज्ञ डॉ. यशवंत मुठाळ यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
गेले काही दिवस तापमान 37 ते 39 डिग्रीपर्यंत वाढलेले आहे. दुपारच्या सुमारास बाहेर पडणेही कठिण झालेले आहे. अंगाची लाही, लाही म्हणजे काय याचा अनुभव सध्या आहे. त्यातच रविवार व सोमवार या दोन दिवशी, तर उष्म्यात मोठय़ा प्रमाणात वाढ झालेली आहे. ढगाळ वातावरण व उष्म्यात झालेली वाढ या अनुषंगाने मुळदेचे शास्त्रज्ञ डॉ. मुठाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मुंबई व पुण्याच्या हवामान विभागाकडून आलेल्या माहितीनुसार 22 एप्रिलपर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. या कालावधीत वादळी पाऊस नसला, तरीही काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कमी आर्द्रतेने थंडावा गायब
मात्र, गेल्या दोन दिवसांपासून म्हणजेच रविवार व सोमवारी जिल्हय़ातील बहुतांश भागात प्रचंड प्रमाणात उष्मा जाणवत आहे. दुपारी बाहेर पडणेही कठिण झाले आहे. याबाबत डॉ. मुठाळ म्हणाले, सध्या हवामान ढगाळ आहे. उन ढगात अडल्यामुळे हवेतील आद्रता अडली जाते. आपल्याकडे सर्वसाधारणपणे आर्द्रता 80 ते 90 टक्के असते. मात्र, गेल्या दोन दिवसांत ही आर्दता 70 ते 75 टक्के एवढी कमी झाली आहे. दुपारच्यावेळी तर ती आणखी कमी होते. यामुळे हवा कोरडी होते. हवेतील गारवा नाहीसा होतो. अशावेळी उष्म्यात झालेली वाढ असहय़ होताना दिसते. हवामान खात्याकडून प्राप्त माहितीनुसार, अशी स्थिती आणखी दोन दिवस म्हणजे 22 एप्रिलपर्यंत राहणार आहे. त्यानंतरचा अंदाज मंगळवारपर्यंत उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.
आंब्यात साका वाढण्याचीही शक्यता
अशा वातावरणामुळे आंबा, नारळ, सुपारी यांचे प्रिमॅच्युअर गळ होण्याचा धोका असतो. सद्यस्थितीत अशा झाडांना पाणी देणे आवश्यक आहे. आजच्या घडीला आंबा अंडाकृती किंवा परिपक्व होत आलेला आहे. अशा स्थितीत तापमानात झालेल्या वाढीमुळे आंब्यात साका होण्याचे प्रमाण वाढण्याचीही शक्यता असते. आंब्याची काढणी करताना अशावेळी सकाळच्या सत्रात सावलीत आंबे काढणे आवश्यक असते. उष्मा असताना आंब्याची काढणी करू नये.
रोपांचीही होऊ शकते मर
सद्यस्थितीत विविध फळरोपे लागवड योग्य तयार करण्यात आलेली आहेत. अशा रोपांना या उष्म्याचा धोका अधिक जाणवत असतो. त्या रोपांची मर होऊ शकते. यासाठी त्यांना पाणी अधिक प्रमाणात देण्याची गरज असते. लागवड केलेल्या रोपांबाबतही काळजी घेण्याची गरज असते. अशा कालावधीत त्या रोपांना पाणी अधिक देण्यासोबतच अळय़ांमध्ये गवताचे आच्छादन करणे तसेच रोपांना सावली करण्याची गरज आहे. अन्यथा यामुळे रोपे करपण्याची शक्यता अधिक असते, असेही डॉ. मुठाळ यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत हवामानात झालेला हा बदल उष्म्याची चाहूल देत असला, तरीही यावर्षी अशा उष्म्याची ही सुरुवात असण्याची शक्यता आहे. पुढील काही कालावधीत उष्म्याचे चटके सहन करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.