अनेक ठिकाणी पाणीच पाणी, जनजीवन विस्कळीत, ग्रामीण भागातही हजेरी
प्रतिनिधी / बेळगाव
यावर्षीही पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक पिकांना फटका बसत असताना आता गेल्या चार दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने शुक्रवारी दुपारी पुन्हा शहर आणि उपनगरांना झोडपले. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीचपाणी झाले तर अनेक सखल भागात पाणी साचून राहिल्याने प्रवाशांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागली. शहरासह परिसराला दमदार पावसाने झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सकाळपासूनच उष्म्यात वाढ झाली होती. त्यानंतर दुपारी प्रारंभी हलक्मया सरीने पावसाला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा जोरदार पावसाने शहराला झोडपून काढले. सध्या हस्त नक्षत्र सुरू आहे.
दुपारी 2.15 वाजण्याच्यासुमारास पावसास प्रारंभ झाला. तर तब्बल 4.45 वाजेपर्यंत पावसाने झोडपून काढले. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. आज गांधी जयंतीनिमित्त सार्वजनिक सुटी होती. त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. मात्र अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. अनेकांना आडोसा घेण्यासाठी धावपळ करावी लागली. किरकोळ भाजी विपेत्यांचीही तारांबळ उडाली.
शहराच्या मध्यवर्ती भागात पाणीच पाणी
शुक्रवारी झालेल्या या पावसामुळे मारुती गल्ली, गणपत गल्ली, रविवारपेठ, चव्हाट गल्ली, दरबार गल्ली, भेंडी बाजार, पांगुळ गल्ली, कलमठ रोड, पाटील गल्ली आदी परिसरात पाणीच पाणी झाले होते. अनेक ठिकाणी गटारी बुजल्याने हे पाणी रस्त्यावर येत होते. त्यामुळे याचा फटका किरकोळ विपेत्यांना बसला. काही ठिकाणी भाजी विपेत्यांची भाजीही या पावसात वाहून गेली. त्यामुळे त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला. दरम्यान शिवाजीनगर येथील पहिली, दुसरी व तिसरी गल्ली या भागात उतार असल्याने मोठय़ा प्रमाणात पाणी साठून होते.
खडेबाजार-शहापूर येथे रस्त्यावर फुटभर पाणी
मागील काही दिवसांपासून खडेबाजार-शहापूर परिसरात स्मार्टसिटी योजनेंतर्गत रस्ता व गटारींची कामे सुरू आहेत. अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे या भागात पाणीच पाणी झाले होते. दरम्यान येथून प्रवास करणाऱया नागरिकांना तब्बल एक फुटभर साचलेल्या पाण्यातून वाट शोधावी लागली. वाट शोधताना अनेकजण त्या पाण्यातच घसरून पडले. त्यामुळे या परिसरातील स्मार्ट सिटीची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.
महांतेशनगरात पूरसदृष्य परिस्थिती
शुक्रवारी सर्वाधिक पाऊस हा महांतेशनगरात परिसरात कोसळला आहे. महांतेशनगरातील सखल भागात तीन ते चार फूट पाणी साचले होते. तर अनेक ठिकाणी पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. नाल्यांमधील पाणी रस्त्यावर येवून अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. तर अनेक घरांत पाणीही शिरले होते. त्यामुळे या भागातील परिस्थिती भयावह झाली होती.
शास्त्रीनगरात घरांमध्ये शिरले पाणी
शास्त्रीनगर, दुसरा क्रॉस व न्यू गुड्सशेड रोडचा नाला तासाभराच्या मुसळधार पावसाने तुडुंब भरुन वाहत होता. यामुळे याचे पाणी परिसरातील घरांमध्ये शिरले. महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षपणामुळे हा फटका नागरिकांना बसला आहे. असा मुसळधार पाऊस पडला की वारंवार या भागात अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देवून येथील समस्या सोडविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
ग्रामीण भागातही पावसाची हजेरी
ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावली आहे. सोयाबीन, बटाटा आणि भुईमूगच्या काढणीचा हंगाम सुरू असताना पडलेल्या पावसामुळे सर्वच कामे खोळंबली आहेत. भात पोसवणीला सुरुवात होत आहे तर काही ठिकाणी पोसवणीही झाली आहे. दरम्यान या पावसामुळे सोयाबिनला मोठा फटका बसला आहे तर बटाटाही कुजण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे.