वार्ताहर/ दाभाळ
लॉकडाऊनच्या काळात गवळीवाडा-निरंकाल येथे वस्तीला असलेल्या वानरमारे कुटुंबियांचे बरेच हाल झाले. हाताशी काम नाही, रेशनची दुकाने बंद व घरात पुरेशे धान्य नसल्याने हातावर पोट असलेल्या या भटक्या लोकांची पहिले पाच सहा दिवस बरीच गैरसोय झाली.
प्रसार माध्यमांतून त्यांची ही परिस्थीती लोकांसमोर आल्यानंतर सरकारी यंत्रणांना त्यांची आठवण झाली. काही समाजसेवी संस्था व समाज कार्यकर्ते त्यांच्या मदतीला धावले. साधार 20 पुटुंबे व शंभरच्या आसपास वानमारे निरंकाल येथे वस्तीला आहेत. त्यामध्ये 40 लहान मुलांचा समावेश आहे. लॉकडाऊनच्या काळात पंचसदस्य विकास प्रभू, सरपंच दुर्गाप्रसाद वैद्य, सरकारी यंत्रणा व काही समाजसेवी संघटनांनी त्यांना तांदूळ, पिठ, कडधान्ये व इतर जीवनाश्यक वस्तू पुरविल्या. सध्या त्यांच्याकडे 15 ते 20 दिवस पुरतील एवढा धान्यसाठा असल्याचे गोपाळ पोवार याने सांगितले. मुलांना दैनंदिन मिळणारा खाऊ मिळत नसल्याने त्यांच्या पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. वानमारे कुटुंबियांपैकी 40 मुले गावातील शाळेत व अंगणवाडीत जायची. त्यांना तेथे मध्यान्ह आहार मिळायचा. सध्या शाळा बंद असल्याने त्यांना हे खाद्यही दुरापास्त झाले आहे. त्यामुळे मुलांची भूक भागत नाही, असे गोपाळ पोवार याने सांगितले. गावातील दुकाने बंद असल्याने बिस्किटे व इतर खाद्यपदार्थही मिळत नाहीत.
ग्रामीण आरोग्य केंद्राचे डॉक्टर व मदतनीस येऊन स्वच्छतेसंबंधी त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या झोपडय़ामध्ये विजेची सोय नाही. त्यामुळे रॉकेलच्या दिव्यावर रात्र काढावी लागते. सध्या रॉकेलही उपलब्ध नसल्याने त्यांना काळोखात रात्री घालव्यावा लागत आहेत.