प्रतिनिधी / कोल्हापूर
हाथरस (उत्तर प्रदेश) येथील सामुहिक बलात्कार प्रकरणाला योगी सरकारच जबाबदार असून हे सरकार तातडीने बरखास्त करण्यात यावे, ही मागणी घेऊन सोमवारी शिवसेनेने बिंदू चौकात निदर्शने केली. यावेळी बलात्कार प्रकरणातील चौघा नराधमांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना फाशी देत कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. पुतळे फासावर लटकविण्यापूर्वी त्यांना चप्पलाने मारण्यातही आले. याचबरोबर त्यांनी बरखास्त करो…बरखास्त करो…योगी सरकार बरखास्त करो, पिडीत मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देऊन बिंदू चौक दणाणुन सोडल्या.
हाथरस येथील सामुहिक बलात्कार प्रकरणाविरोधात गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरात सातत्याने संतप्त पडसाद उमटू लागले आहेत. सोमवारी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली बिंदू चौकात निदर्शने झाली. कार्यकर्त्यांनी निदर्शन करण्यासाठी सोबत फाशीचे दोरखंड व चौघांचे पुतळेही आणले होते. यावेळी पुतळ्यांना चप्पलाने मारत योगी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. आपल्या भावना व्यक्त करताना पवार म्हणाले, योगी सरकार मुली, महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे.
पिडीत मुलीचे पार्थिव कुटुंबियांना न देण्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. बलात्कार प्रकरणातील नराधमांना लवकरात लवकर फासावर चढवायचे असेल तर खटला हा जलदगती न्यायालयातच चालवला जावा, अशीही मागणी यावेळी पवार यांनी केली. जिल्हा प्रमुख विजय देवणे म्हणाले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या देशात एखाद्या मुलीवर बलात्कार होणं हे अतिशय लांच्छणास्पद आहे. इतकेच नव्हे तर दलित विरुद्ध ठाकूर असा संघर्ष उत्तर प्रदेशात असणं हे देखील योगी सरकारासाठी अशोभनिय आहे. तेव्हा सरकारने तातडीने राजीनामा देणेच योग्य होईल.
यावेळी शिवसेना शहराध्यक्ष शिवाजीराव जाधव, माजी आमदार सुरेश साळोखे, माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख शुंभांगी पोवार, आदी उपस्थित होते