सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काही दिवसांपूर्वी साऱया देशात संतापाची लाट उसळविणाऱया उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या चौकशीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने लक्ष ठेवावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने हा आदेश दिला. या प्रकरणाची सुनावणी उत्तर प्रदेशाच्या बाहेर करावी, ही मागणी पीठाने फेटाळली.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका दलित तरुणीवर निर्घृण बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती असा आरोप आहे. या दलित तरुणीला न्याय मिळावा, यासाठी आंदोलने होत असून या प्रकरणाला राजकीय रंगही प्राप्त झाला आहे. या प्रकरणाच्या चौकशीत न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करणाऱया अनेक याचिका सादर करण्यात आल्या आहेत. त्या सर्वांची एकत्र सुनावणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने या चौकशीवर लक्ष ठेवावे. काही समस्या निर्माण झाली तर आम्ही आहोतच, असेही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील पिडीतेच्या वकिलांनी हे प्रकरणे सुनावणीसाठी अन्य राज्यांमध्ये न्यावे अशी मागणी केली होती. तथापि, ती फेटाळण्यात आली आहे.
सीबीआयने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. उत्तर प्रदेश सरकारची बाजू मांडणारे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी या प्रतिज्ञापत्राचा उल्लेख करून पिडीतेच्या नातेवाईकांना पूर्ण संरक्षण दिले असल्याचे प्रतिपादन केले. तसेच या प्रकरणाची चौकशी यथायोग्य पद्धतीने केली जात असल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर न्यायालयाने उच्च न्यायालयावर लक्ष ठेवण्याचे उत्तरदायित्व दिले.