- शिवसेना आमदाराची गृहमंत्र्यांकडे मागणी
ऑनलाईन टीम / मुंबई :
उत्तर प्रदेशातील दलीत मुलीवर झालेल्या बलात्कारामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. मात्र, या प्रकरणी योगी सरकार गप्प का? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यातच आता शिवसेनेने देखील योगी सरकारवर निशाणा साधला आहे.
या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी करावा, अशी विनंती गृहमंत्री अनिल देशमुख यांना शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. या संदर्भात ट्विट करत त्यांनी ही मागणी केली आहे.
प्रताप सरनाईक आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथसर घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकार अत्यंत बेजबाबदारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुंबईत यावर गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी उत्तर प्रदेशात पाठवावे अशी विनंती गृहमंत्री अनिल देशमुख यांना करतो, असे म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणी योगी सरकारने पोलीस अधीक्षक, उप अधीक्षक, पोलीस निरीक्षकासह इतर अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यासोबतच हाथरस प्रकरणात पोलीस अधीक्षक आणि उप अधीक्षक या दोघांचीही नार्को आणि पॉलिग्राफ चाचणी केली जाणार आहे असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.