51 टन हापूस, नारळाची मुंबईला घरपोच डिलिव्हरी : सिंधुदुर्गच्या इतिहासात पोस्टाकडून पहिलाच प्रयोग : आंबा, नारळ वाहतुकीतून 2 लाख 34 हजाराचा नफा
दिगंबर वालावलकर / कणकवली:
लॉकडाऊनमध्ये जिल्हय़ातील आंबा बागायतदारांच्यादृष्टीने महत्वाची समस्या होती ती म्हणजे, ऐन हंगामात हापूस आंबा मार्केटमध्ये पाठविण्याची व्यवस्था होण्याची. सुरुवातीच्या काळात जिल्हय़ाबाहेर वाहतूकच बंद होती. अशा अडचणीच्या काळात सिंधुदुर्गातील आंबा बागायतदारांच्या मदतीला पोस्ट खात्याची ‘मालमोटार’ धावली आहे. जिल्हय़ातील सुमारे 51 टन हापूस आंबा व नारळ या मालमोटारीतून मुंबईला घरपोच डिलिव्हरी देण्यात आली. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये अनेक काही नव्या घडलेल्या गोष्टीत सिंधुदुर्गातील हापूस आंबा, नारळ बागायतदारांच्यादृष्टीने ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. कोकणातील बागायतदारांना एक नवीन पर्यायही उपलब्ध झाला आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे मुंबई-पुण्याला धावणाऱया गाडय़ा बंद झाल्या. त्यामुळे ऐन हापूस आंब्याच्या हंगामात जिल्हय़ातील बागायतदारांसमोर मार्केटची मोठी समस्या उभी राहिली. वाहतूक ठप्प झाल्याने तयार होत असलेला आंबा मार्केटमध्ये कसा पाठवायचा, असा प्रश्न होता. याला पोस्टाकडून पर्याय शोधण्यात आला. एकिकडे कोकण रेल्वेने पार्सल रेल्वे सुरू केली. पण पार्सल रेल्वेला वेळ ठरवून दिला होता. या वेळेतच ही रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर धावत होती. मात्र, पोस्टाने बागायतदारांच्या वेळेनुसार थेट बागेत जाऊन आंबा मुंबईला पोहोचविण्याची तयारी दाखविली व ती यशस्वीही केली.
जिल्हय़ातून 11 फेऱया मुंबईला!
30 एप्रिल ते 20 मेपर्यंत पोस्ट विभागाच्या 11 फेऱया मुंबईला धावल्या. 200 आंब्याच्या पेटय़ांचा लोड झाला, की मुंबईच्या रस्त्यांवर धावणारी पोस्टाची मेलमोटार मागविली जायची. एका मेलमोटारीत 200 आंब्याच्या पेटय़ा बसविल्या जायच्या. या पेटय़ा एकाच ठिकाणी मिळाल्या नाहीत, तर दोन-तीन बागायतदारांच्या बागेतील पेटय़ा एकत्र करून त्या मुंबईला रवाना होत असत. या मेलमोटारीच्या एका ट्रीपला भाडे ठरविताना पाच डझनची एक सुमारे 20 किलोची आंब्याची पेटी वेंगुर्ल्याहून मुंबईत पाठवायची झाल्यास त्यासाठी 200 रुपये शुल्क आकारले जात असे. नारळाची 25 किलोची एक गोणी 250 रुपयात मुंबईला पोहोचविण्यात येत असे.
बागायतदार ते ग्राहक थेट मार्केट!
हापूस थेट बागायतदारांच्या बागेत जाऊन मेलमोटारीत भरला जायचा. तेथून तो जेथे मुंबईला पोहोचवायचा होता, तेथे डिलिव्हरी दिला जायचा. त्यामुळे बागायतदार ते थेट ग्राहक असा नवीन पर्यायही उपलब्ध झाला. जिल्हय़ात वेंगुर्ले, वायंगणी, तुळस, तळवडे, कोचरा, मालवण, वाडा, विजयदुर्ग, पडेल, मुटाट, हिंदळे येथून आंबा मुंबईला पाठविण्यात आला. नारळ मालवण व वेंगुर्ले येथून पाठविण्यात आले.
2300 हापूस पेटय़ा मुंबईला!
हापूस व नारळ मिळून एकूण 51 टनाच्या 2300 पेटय़ा मुंबईला पाठविण्यात आल्या. रत्नागिरी, पुणे अशा भागात या मेलमोटारीचा वापर करण्यात येतो. पण सिंधुदुर्गात प्रायोगिक तत्वावर हा पहिलाच प्रयोग पोस्टाकडून करण्यात आला. लॉकडाऊन ही समस्या नाही, तर संधी समजून पोस्टाने हा प्रयत्न केला. त्याला चांगले यश मिळाले. मुंबईहून येणारी मेलमोटार पोस्टाचे टपालही घेऊन येत असे. लॉकडाऊनमुळे मुंबईतील वाहतूक बंद असल्याने या मेलमोटारी कोकणात पाठविण्यात आल्या. या प्रयत्नातून पोस्टाला जीएसटी, डिझेल खर्च, वगळून 2 लाख 34 हजार निव्वळ नफा झाला.
असाही मदतीचा हात!
मुंबई, ठाणे जिल्हय़ात कल्याण, कांदिवली, डोंबिवली, चेंबुर, सायन, पनवेल अशा अनेक भागात हापूस व नारळ घरपोच मेलमोटारीने पोहोचविण्यात आले. इतरवेळी पार्सल पोहचविण्याचे काम या मेलमोटारी करतात. मेलमोटार सर्व्हिस ही सध्या मुंबई, पुणे, गोव्यात सुरू आहे. त्याचा उपयोग पोस्टाने करून कोकणातील बागायतदारांना मार्केटही उपलब्ध केले.
यांनीही केले होते प्रयत्न!
हापूसला मुंबई-पुणे येथे बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात आमदार नीतेश राणे, आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांनीही प्रयत्न केले. राणे यांनी मुंबईत बिग बाझार, डी मार्ट असा पर्याय बागायतदारांना उपलब्ध करून दिला. नाईक यांनी आंबा मार्केट उपलब्ध आहे मात्र वाहतुकीची अडचण होती, ती दूर करण्यासाठी आंबा वाहतुकीचे ई पास देण्याबाबत पाठपुरावा केला होता. खासदार विनायक राऊत यांनीही मुंबईत हापूसला मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले होते.
जिल्हय़ात मेलमोटार सेवेसाठी प्रयत्न!
जिल्हय़ात कुडाळ येथे पोस्टाचे सॉर्टिंग ऑफिस आहे. जिल्हय़ात पोस्टाचे येणारे टपाल हे पहिले कुडाळ येथे येते. तेथून जिल्हय़ात वितरण केले जाते. यासाठी पोस्टाकडून एसटी सेवेचा वापर केला जातो. येत्या काळात एसटीने टपाल पोहोचविण्याऐवजी मेलमोटारच्या माध्यमातून टपाल वितरित करण्याचा पोस्ट विभागाचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हय़ात सध्या कॉन्ट्रक्ट बेसवर असलेल्या मेलमोटारीचा वापर टपाल पोहोचविण्यासाठी करण्यात येतो. हा वापर कायम करण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.