हैदराबाद/प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी प्रकारचे देशभरात पडसाद उमटत आहेत. भाजपवर यावरून टीका होत आहे. आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लखीमपूर खेरी हिंसाचार घटनेवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी भाजपा लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या घटनेत आशिष मिश्राला वाचवत आहे असे ओवेसी यांनी म्हटले आहे. तसेच हायकमांच्या परवानगीशिवाय काहीही होऊ शकत नाही. तसेच ही घटना पूर्वनियोजित असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. लखीमपूर प्रकरणावरून ओवेसी यांनी पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
“या प्रकरणाला घटना म्हणता येणार नाही. ही पूर्णपणे नियोजनासह केलेली हत्या आहे. भाजपा आणि आरएसएसमध्ये कोणतेही काम होते ते वरच्यांच्या परवानगीशिवाय होत नाही. पूर्णपणे नियोजनाद्वारे निष्पाप शीख शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्यात आले. ही आवेगपूर्ण प्रतिक्रिया नव्हती तर पूर्णपणे नियोजनाद्वारे हे कृत्य करण्यात आले,” असे ओवेसी यांनी आज तकसोबत बोलताना म्हटले आहे.
“केंद्रीय मंत्र्यांच्या भाषणानंतर हा हिंसाचार झाला आहे आणि त्यानंतर खूप वेळानंतर मंत्र्यांच्या मुलाला अटक करण्यात आली. मंत्र्यांनी सुद्धा कबुल केले आहे की ती आमची गाडी होती. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्यानंतर पोलीस त्याला बोलवतात. तपासाच्या ११ तासांमध्ये १० वेळा नाष्टा दिला जातो. खूनाच्या आरोपीला तुम्ही १० वेळा खायला घालता? तो पोलिसांकडे नाही तर सासूरवाडीला गेला होता असे वाटत. भाजपा सरकार कोणाला मूर्ख बनवत आहे. नरेंद्र मोदी किंवा योगी आदित्यनाथ मिश्रा यांचा संबंध एका उच्च जातीसोबत असल्याने त्यांना वाचवत आहे. भाजपा पूर्णपणे त्यांना वाचवत आहे,” असे ओवेसी यांनी म्हटले आहे.