कुडाळ-उद्यमनगर येथील प्रकार
दुचाकीस्वारांना येत नाही अंदाज
मोठी दुर्घटना घडण्याची भीती
वार्ताहर / कुडाळ:
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर येथील उद्यमनगरमधील टीव्हीएस शोरुम समोरचा रस्ता समांतर न ठेवता मधोमध काही अंतरापर्यंत दोन भाग करण्यात आले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वाराना अंदाज येत नसल्याने तेथे अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. रात्रीच्यावेळी मोठी दुर्घटना होण्याची भीती नाकारता येत नाही.
त्याच ठिकाणी या नवीन रस्त्याला खड्डे पडले आहेत. जीव मुठीत धरून दुचाकी चालवावी लागते. रस्त्याची उंची न वाढविल्याने पाणीही साचते. हायवे ठेकेदाराच्या हलगर्जीपणाबाबत प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय नेतेही गप्प राहून ठेकेदाराच्या मनमानीला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
निकृष्ट कामाचे दर्शन
महामार्ग चौपदरीकरण काम घाईगडबडीत आटोपताना येथील उद्यमनगर परिसरात ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचे दर्शन होते. नवीन रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे. टीव्हीएस शोरुम समोरच्या दुपदरी रस्त्याला डांबरीकरण करण्यात आले. तेथे डांबराचे काही अंतरापर्यंत दोन थर ठेवले असून उंच-सखलपणा निर्माण झाला आहे. दुसऱया बाजूचा मार्ग काँक्रिटचा तयार केला असून त्यावरून वाहतूक सुरू केली नाही. त्यामुळे डांबरीकरण केलेल्या या दुपदरीवरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू आहे.
मोठी दुर्घटना होण्याची शक्यता
वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. रस्ता समांतर नसल्याने या दुपदरीच्या मध्यभागी दुचाकी उतरविताना व चढवताना घसरुन अपघाताच्या घटना घडत आहेत. रात्रीच्यावेळी त्याचा अंदाज येत नाही. आतापर्यंत झालेल्या अपघातात सुदैवाने किरकोळ दुखापतीवरच निभावले. मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असतानाही हायवे ठेकेदार दुर्लक्ष करीत आहे.
नवीन रस्त्यावर खड्डे
त्याच भागात या नवीन रस्त्यावर खड्डे पडले असून वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याच ठिकाणी गटार खोदाई करण्यात आली नाही. पावसाचे पाणी रस्त्यावर साचत आहे. तेथीलही दुरवस्था पाहता तो चौपदरीकरण रस्ता आहे का?, असा प्रश्न पडत आहे.
रस्त्याची उंची वाढविणे आवश्यक
या महामार्गाच्या ठिकाणी दुतर्फा पावसाच्या पाण्याचा प्रवाह जास्त असतो. तेथे गटार खोदून पाण्याचा निचरा करण्यासाठी ठेकेदाराने उपाययोजना केली नाही. त्याठिकाणी रस्त्याची उंची वाढविणे आवश्यक होती. मग पाण्याचा निचरा झाला असता.
वाहनधारक, नागरिकांमधून संताप
या रस्त्यावरून दुचाकीस्वार जीव मुठीत धरून वाहन चालवितात, तरीही काहीवेळा रस्त्याच्या या दुर्दशेमुळे अपघात घडतात. ठेकेदार प्रतिनिधी व हायवे अधिकारी यांची या महामार्गावरून नेहमी ये-जा असते. पण ते याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. तेथील कामही अर्धवट स्थितीत आहे. ठेकेदार मनमानी काम करीत असल्याने वाहनधारक व नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. लॉकडाऊननंतर दीड-दोन महिन्यांनी ठेकेदाराने पुन्हा काम सुरू केले, पण घाईगडबडीत काम आटोपते घेण्याच्या तयारीत असल्याने त्यात दर्जेदारपणा दिसत नाही. भविष्यात ते किती वर्षे टिकणार?, हाही प्रश्नच आहे.
लोकप्रतिनिधींचा वचक नाही
लोकांनी रस्त्याच्या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर लोकप्रतिनिधी जागेवर जाऊन अधिकारी व ठेकेदाराला सूचना करतात. त्यांच्यासमोर माना डोलावतात. मात्र, पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’, असेच चित्र पाहायला मिळते. लोकप्रतिनिधींचा वचक नाही. ठेकेदाराच्या निकृष्ट कामाबाबत सत्ताधारी त्याच्यावर कारवाई करण्याची भाषा करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. ठेकेदार आपल्या मर्जीनुसारच काम करीत आहे.
सुखकर प्रवासाची अपेक्षा
सुरुवातीला एखाद्या समस्येबाबत आक्रमक होणारे विरोधकही नंतर बोलत नाहीत. राजकीय आशीर्वादामुळे ठेकेदार बेजबाबदारपणे वागत असल्याचा आरोप सर्वसामान्य जनता करीत आहे. कोटय़वधी रु. निधी खर्च होत असलेल्या या महामार्गावरून सुखकर प्रवास करायला मिळावा, हीच लोकप्रतिनिधींकडून त्यांना अपेक्षा आहे.