कणकवली/ वार्ताहर-
महामार्ग चौपदरीकरणांतर्गत विशेषतः नांदगांव परिसरात कित्येक समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र , वारंवार लक्ष वेधूनही संबंधितांकडून दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ यापूर्वी दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्हा सरपंच असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी जि. प. सभापती नागेश मोरये यांनी सोमवारी सकाळपासून येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर, उड्डाण पुलाखाली आमरण उपोषण सुरु केले. यावेळी नांदगांव परिसरातील अनेक ग्रामस्थही श्री. मोरये यांच्यासोबत साखळी उपोषणास बसले होते.
सकाळच्या सत्रात शिवसेना नेते सतीश सावंत, माजी सभापती जयेंद्र रावराणे यांच्यासह अनेकांनी उपोषणस्थळी दाखल होऊन मोरये यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. मात्र , दुपारपर्यंत कुणी अधिकारी उपोषणस्थळी फिरकले नव्हते.
मोरये म्हणाले, महामार्गाचे चौपदरीकरण गरजेचेच होते. मात्र, चौपदरीकरणांतर्गत नांदगाव परिसरातील अनेक कामे अपूर्ण ठेवलेली आहेत. त्यामुळे भातशेतीचे नुकसान होत आहे. पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे. चौपदरीकरणात तांत्रिक बाबी विचारात घेतलेल्या नाहीत, याचा मोठा फटका आम्हा ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. काहीजण तर हायवेमध्ये गेलेल्या जमिनींच्या मोबदल्यापासूनही वंचित आहेत. अशा कित्येक मुद्द्यांबाबत आम्ही सातत्याने आवाज उठवत आहोत. तरीही संबंधित विभागांकडून कार्यवाही सोडाच, समाधानकारक उत्तरेही मिळत नाहीत. म्हणूनच मी आमरण उपोषणास बसलो आहे. जोपर्यंत संबंधित जबाबदार अधिकारी येऊन समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरुच राहणार असल्याचा इशारा मोरये यांनी दिला.
मोरये यांच्यासमवेत माजी सरपंच शशिकांत शेट्ये, पंढरी पारकर, गुणाजी चव्हाण, गजानन रेवडेकर, अतुल नावळेकर, विजय म्हाडेश्वर, सुनील आंबेरकर, शामसुंदर मोरये, संतोष साळुंखे, लवू लाड, हेमंत पाटणकर, संजय शिरसाट, अमोल तेली, शशिकांत मोरये आदी उपस्थित होते.