वार्ताहर / परळी :
तालुक्यातील परळी भागातील काळोशी येथे शनिवारी सायंकाळी अचानक हायव्होलटेज झाल्याने जवळपास 35 टिव्ही, काही फ्रीज आणि लाईटचे मीटरही जळाले. महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला असून, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, मागील दोन महिन्यांपासून स्थानिक नागरिक महावितरणकडे व्होलटेज कमी जास्त होत असल्याची तक्रार देत आहेत. तरीदेखील संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली असून, कोरोनासारख्या महामारीत लोकांना मोठा फटका बसला आहे. ही चूक महावितरणची असल्याने संबंधितांना नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा महावितरणच्या मुख्य कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.