भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची कारणमीमांसा, संघाचा समतोल बिघडल्याची कबुली
केपटाऊन / वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत हार्दिक पंडय़ा, रविंद्र जडेजासारखे अव्वल खेळाडू उपलब्ध नसल्याने संघात योग्य समतोल साधता आला नाही. त्याचा संघाला मालिकेत फटका बसला, अशी स्पष्ट कबुली भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिली. भारताला यजमान द. आफ्रिकेविरुद्ध सलग तिसऱया वनडे लढतीतही पराभव पत्करावा लागल्यानंतर व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर मधल्या षटकातील निराशाजनक कामगिरी, केएल राहुलची नेतृत्वातील कामगिरी, अशा विविध मुद्यांवर द्रविडने यावेळी आपली मते मांडली.
‘या मालिकेत 6 ते 8 क्रमांकावर निवडीसाठी चांगले पर्याय उपलब्ध नव्हते, ही वस्तुस्थिती आहे. हार्दिक पंडय़ा व जडेजा परततील, त्यावेळी संघाला बळकटी येईल. केएल राहुलने व्यक्तिशः उत्तम योगदान दिले. पण, नेतृत्व हे संघसहकाऱयांकडून दर्जेदार कामगिरी साकारुन घेण्यावर अवलंबून असते’, असे द्रविड म्हणाले. तिन्ही वनडे लढतीत 20 ते 40 षटकादरम्यान आमची फलंदाजी निराशाजनक झाली, याचा उल्लेख त्याने केला.
वनडे मालिकेत सर्वाधिक धावा (किमान 100 धावा)
फलंदाज / सामने / डाव / धावा / सर्वोच्च / स्ट्राईक रेट / शतके / अर्धशतके
क्विन्टॉन डी कॉक / 3 / 3 / 229 / 124 / 96.62 / 1 / 1
रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन / 3 / 3 / 218 / 129/ 112.95 / 1 / 1
शिखर धवन / 3 / 3 / 169 / 79 / 86.66 / 0 / 2
तेम्बा बवूमा / 3 / 3 / 153 / 110 / 80.10 / 1 / 0
विराट कोहली / 3 / 3 / 116 / 65 / 76.31 / 0 / 2
रिषभ पंत / 3 / 3 / 101 / 85 / 107.44 / 0 / 1
वनडे मालिकेत सर्वाधिक बळी (किमान 3 बळी)
गोलंदाज / सामने / डाव / षटके / दिलेल्या धावा / बळी / सर्वोत्तम
फेलुकवायो / 3 / 3 / 20.0 / 110/ 6 / 3-40
बुमराह / 3 / 3 / 30.0 / 137 / 5 / 2-48
एन्गिडी / 3 / 3 / 28.0 / 157 / 5 / 3-58
शमसी / 2 / 2 / 19.0 / 109 / 4 / 2-52
प्रसिद्ध कृष्णा / 1 / 1 / 9.5 / 59 / 3 / 3-59
केशव महाराज / 3 / 3 / 29.0 / 133 / 3 / 1-39
कोट्स
ही मालिका 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकण्याचे लक्ष्य आम्हाला साध्य करता आले, त्यात कर्णधार तेम्बा बवूमाचे योगदान महत्त्वाचे होते. डी कॉक नेहमीच सर्वोत्तम योगदान देत आला आणि ही मालिकाही त्याला अपवाद नव्हती.
-द. आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर
वामिकावर फोकस नको ः विराट
द. आफ्रिकेविरुद्ध तिसऱया व शेवटच्या वनडेत विराटने अर्धशतक झळकावल्यानंतर गॅलरीत उपस्थित पत्नी अनुष्का व कन्या वामिका यांच्या दिशेने निर्देश करत अभिवादन केले आणि वामिका अशा रितीने प्रथमच प्रकाशझोतात आली. मात्र, विराटने त्यानंतर वामिकाला सोशल मीडियाची ओळख होईतोवर तिची छायाचित्रे घेऊ नयेत, अशा आशयाची विनंती पुन्हा एकदा केली.
विराट व अनुष्का यांनी यापूर्वीही एकदा वामिकाची छायाचित्रे घेऊ नयेत किंवा प्रसारित करु नयेत, अशी विनंती केली होती. पण, विराटने अर्धशतक साजरे करताना स्टॅण्डकडे पाहिल्यानंतर कॅमेराही अनुष्का-वामिकाच्या दिशेने वळवला गेला आणि इथेच वामिका प्रथमच प्रकाशझोतात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही चाहत्यांनी ब्रॉडकास्टर्सवर यावेळी टीकाही केली.