मागून आलेल्या कारची टाटा सुमोला धडक
बेंगळूर : टाटा सुमो व कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर 10 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे 4 वाजता हासन जिल्हय़ातील भुवनहळ्ळी बायपासजवळील केंचट्टळ्ळीच्या बेंगळूर-मंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. प्रदीपकुमार, चंद्रशेखर, नवीनकुमार, सुनीलकुमार आणि अनिलकुमार अशी मृतांची नावे असून हे सर्वजण केजीएफ येथील रहिवासी आहेत. सदर सर्वजण लग्न समारंभासाठी उडुपीला जात होते. जखमींमधील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना टाटा सुमो चालकाने आपल्या वाहनाची गती कमी केली. त्यामुळे मागून आलेल्या कारने टाटा सुमोला जोराची धडक दिली. या धडकेत चौघांचा जागीच तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर सुमो धर्मस्थळला जात असल्याचे समजते. जखमींना हासन जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी जिल्हा पोलीसप्रमुख श्रीनिवास गौड यांनी भेट देऊन पाहणी केली. अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.