प्रतिनिधी/ पणजी
आषाढ महिना संपला की सगळय़ांना श्रावण महिन्याचे वेध लागतात. आज मंगळवार दि. 21 रोजीपासून श्रावण सुरू होत आहे. श्रावण महिना सुरू होताच सणांची शृंखलाच सुरू होते. आनंदाने भरलेला असा हा महिना यास निसर्ग ही समरसतेने साथ देतो. नागपंचमी, राखीपौर्णिमा हे खास स्त्रियांचे सण याच महिन्यात येतात. त्यानंतर येणारे गौरी गणपतीही खुणावत असतात. आपल्या कृषिप्रधान देशात आजही शेतकऱयांचा मित्र असणाऱया, पिकाची नासधूस करणाऱया उंदीर घुशींचा नायनाट करणाऱया सर्पदेवतेची पूजा केली जाते. पंचमीनंतर येणारी राखीपौणिमा म्हणजे स्त्रियांच्या जिव्हाळय़ाचा सण. यादिवशी सकाळपासून घरादारात चकरा सुरू होतात. भावाची आतुरतेने वाट पाहिली जाते. या सणाबरोबरच सोमवार, मंगळागौर, सत्यनारायण हे खास श्रावणाचे मानकरी असतातच. अशा आनंदी वातावरणामुळेच श्रावणात मनाच्या कोपऱयात उत्साहाचे नवे ऋतू फुलत असतात.
श्रवणाचा महिना
श्रावण महिना म्हणजे हर्ष उत्साहाचा महिना, ऊन पावसाचा खेळ. इंद्रधनुचा रंग याच श्रावणात पाहायला मिळतो. कधी अचानक जोरदार पावसाच्या सरी कोसळतात तर कधी अचानक ऊन पडते. त्यामुळे सगळीकडे प्रसन्न वातावरण असते. श्रावण महिना श्रवणाचा महिना आहे. या महिन्यात देवाच्या कहाण्यांचे तसेच पोथ्यांचे वाचन करतात. या महिन्यात निरनिराळय़ा पुस्तकांचे वाचन करून श्रावण महिन्यातील व्रतांची माहिती मिळविली जाते. या महिन्यातील नागपंचमी हा दिवस स्त्रियांसाठी मोठा सण आहे. यादिवशी स्त्रिया नागाची पूजा करतात. घरात नागाची मूर्ती तयार करून किंवा भिंतीवर नागाचा फोटो लावून पूजा केली जाते.
मंगळागौर पूजन
श्रावणातील सोमवाराचे खूप महत्त्व आहे. या दिवशी शंकराच्या पिंडीवर बेल वाहून दुग्धाभिषेक करून उपवास केला जातो आणि संध्याकाळी गोडाचा नैवेद्य करून उपवास सोडला जातो. श्रावणातील मंगळवार तर नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी आनंद पर्वणी असते. नवीन लग्न झालेल्या मुली पहिली पाच वर्षे श्रावणातील मंगळवारी मंगळागौर पूजतात. पहिल्या वर्षी पहिला मंगळवार माहेरी आईच्या घरी करतात आणि त्यानंतर पाच वर्ष सासरी करतात व शेवटच्या वर्षी उद्यापन केले जाते. रात्री जागरण करून वेगवेगळे खेळ खेळले जातात. नारळी पौर्णिमा हा सण कोळी लोक साजरा करतात. रोजीरोटी देणाऱया समुद्राची पूजा करतात व नारळी पौर्णिमा हा दिवस नाच गाणी म्हणून साजरा करतात. तसेच रक्षाबंधनदिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते व भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याची हमी देतो.
परंपरांचे जतन
आजच्या आधुनिक काळातील मुली आणि स्त्रियांनी आधुनिक जीवनशैलीचा स्वीकार केला असला तरी परंपरांकडे पाठ फिरवलेली नाही. परंपरांचे जतन करताना आवश्यक तिथे बदल केले जातात. पण मूळ भावना, संवेदना संपत नाहीत. मन, निसर्ग आणि संस्कृती यांच्या समीकरणातून निर्माण झालेल्या या परंपरा दीर्घकाळ टिकून राहतील इतक्या परिपक्व आहेत हे विसरून चालणार नाही.