ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्र सरकारने दिल्लीमध्ये नव्या संसद भवनाच्या सेंट्रल व्हिस्टा रीडेव्हलपमेंट प्रकल्पाचा समावेश अत्यावश्यक सेवेत केला आहे. त्यामुळेे लॉकडाऊन सारख्या निर्बंधाच्या काळातही सेंट्रल व्हिस्टाचे बांधकाम सुरु राहणार आहे. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सेंट्रल व्हिस्टा हा एक गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय आहे. लोकांच्या जीवनाचा प्रश्न असताना नवे घर मिळवण्यासाठी आंधळा अहंकार नको, असा टोला त्यांनी यांनी मोदी सरकारला मारला आहे.
गेल्या आठड्यातच काँग्रेसने सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा अत्यावश्यक सेवेत समावेश केल्याच्या बातमीची लिंक शेअर करत, ही वास्तू म्हणजे तुमच्या निर्दयतेची साक्ष देणारी वास्तू असेल हे लक्षात ठेवा, असे मोदी यांना म्हटले होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 डिसेंबर रोजी या नव्या संसद भवनाचे भूमिपूजन केले होते. या प्रोजेक्ट अंतर्गत पुढील वर्षाच्या डिसेंबर पर्यंत ज्या इमारतीचे काम पूर्ण होणार आहे, त्यामध्ये पंतप्रधान निवासस्थानाचाही समावेश आहे.