खासदार संभाजीराजे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल : पोलीस भरतीला स्थगिती देण्याची मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्य सरकारने घोषित केलेल्या पोलीस भरतीच्या निर्णयाला खासदार संभाजीराजे यांनी कडाडून विरोध केला आहे. जो पर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती करण्यात येवू नये, अशी मराठा समाजाची मागणी असताना राज्य सरकारने भरतीची घोषणा करून जणू मराठय़ांना चिथावणी देण्याचा प्रकार केला आहे. मराठा समाजाला एकटे पाडण्याचा हा कुटिल तर डाव नाही ना? अशा शब्दात संभाजीराजे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
प्रतिक्रिया देताना संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. त्याचे मराठा समाजामध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. त्या भावनेचा राज्य सरकारने आदर केला पाहिजे. अशा अडचणीच्या काळात राज्य सरकारने पोलीस भरतीचा निर्णय जाहीर करून मराठा समाजाला चिथावणी देण्याचा प्रकार केला आहे. मराठा समाज या निर्णयाचा विरोध करणार हे माहिती असून सुद्धा तुम्ही पोलीस भरती काढली, हे पूर्णतः चुकीचे आहे. मराठा समाजाला एकटे पाडण्याचा हा कुटील डाव तर नाही ना? अशी अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.
संभाजीराजे म्हणाले, मी शासनाला एकच सांगू इच्छितो, की मराठा समाज हा इतरांचे हक्क हिरावून घेऊ इच्छित नाही. त्यांना त्यांचा हक्क हवा आहे. आणि या लढय़ात सर्व जाती समूह मराठा समाजाच्या सोबत आहेत. मोठा भाऊ अडचणीत असल्यामुळे सर्व बहुजन समाज हा लहान भावाप्रमाणे मराठा समाजाच्या सोबत होता, आहे आणि राहणार. जे आरक्षण मिळाले होते, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश देण्यात यावेत. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातून आरक्षण कायम होत नाही तोपर्यंत, कोणत्याही प्रकारची नोकर भरती काढू नये. सध्याच्या परिस्थितीत नोकर भरती केली, तर त्याविरोधात मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द टिकवून ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची आहे. मराठा समाजाची भावना राज्य सरकार लक्षात घेऊन निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे, असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.