ऑनलाईन टीम / मुंबई :
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा करणे हा मुख्यमंत्र्यांचा नव्हे तर राज्यातील जनतेचा अपमान आहे. कायद्याच्या चौकटीबाहेर जाणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे, असे मलिक यांनी म्हटले आहे.
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान महाडमध्ये नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानशिलात लगावण्याची भाषा केली होती. त्यामुळे राणेंवर नाशिक, महाड आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक पोलीस राणेंना अटक करण्यासाठी चिपळूणला रवाना झाले आहेत.
राणेंच्या या वक्तव्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून,
राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही नारायण राणे यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. आज चिपळूणमध्ये जनआशिर्वाद यात्रेदरम्यान राणेंना अटक होण्याची शक्यता आहे.