मुंबई \ ऑनलाईन टीम
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोप प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे.सीबीआय पाठोपाठ ईडीने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सचिन सावंत यांनी एकापाठोपाठ ट्वीट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ED ने दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे. कोरोना हाताळण्यात मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे, तसंच राजकीय सूडबुद्धी ही आहे, अशी टीका सावंत यांनी ट्वीटच्या माध्यमातून केली आहे.
तसंच, परमबीर सिंग यांच्या खोट्या आरोपांवरून कारवाई केली आहे. आरोपांचे विश्लेषण केले तरी सचिन वाझेने 100 कोटी जमवण्यास सांगितले असे म्हटले. परमबीर सिंग यांनी ही तेच म्हटले. पैसे दिले असे आरोपकर्तेही म्हणत नाही. मग CBI धाडी कशावर टाकत होती? पैसे दिलेच नाही तर ED कशाला? , असा खडा सवाल सावंत यांनी विचारला आहे.
जर पैसे दिले असे CBI व ED चे म्हणणे असेल तर परमबीर सिंग व वाझेवर कारवाई का नाही? हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे. जनता ही आता हे ओळखून आहे. या राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे जोक झाला आहे, असा टोला देखील सावंत यांनी लगावला आहे.