ऑनलाईन टीम / जयपूर :
हा देश हिंदूंचा आहे. हिंदुत्त्ववाद्यांचा नाही. हिंदू आणि हिंदुत्ववादी दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत, याच शब्दांची देशात आज टक्कर पहायला मिळते. महात्मा गांधी हिंदू आणि गोडसे हिंदुत्ववादी हा यातला फरक आहे. मी ही हिंदू आहे. हिंदुत्त्ववादी नाही. हिंदू सत्य समोर आणतो. त्यासाठी झटतो. पण शेवटी हिंदुत्ववाद्याने महात्मा गांधीजींच्या छातीत गोळय़ा घातल्या. हिंदुत्ववादी सत्तेसाठी काहीही करतात. त्यांना सत्याशी काहीही देणं घेणं नाही. त्यांचा मार्ग सत्ता मिळवण्याचा आहे, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपला लगावला.
जयपूरमध्ये आज महागाईविरोधात आयोजित रॅलीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रॅलीला संबोधित केले. ते म्हणाले, आज भारतातील एक टक्के लोकसंख्येच्या हातात 33 टक्के संपत्ती आहे. केवळ 10 टक्के लोकांच्या हातात 65 टक्के पैसा आहे. आणि सर्वात गरीब 50 टक्के लोकांच्या हातात फक्त 6 टक्के पैसा आहे. हे सरकार हिंदुत्त्ववादी आहे. ते उद्योगपतींसाठी काम करते. सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते. मात्र, हिंदू आपले संपूर्ण आयुष्य सत्याच्या शोधात घालवतो. तो सत्याग्रह करतो.
70 वर्षांचे तुणतुणं वाजवणं बंद करा, 7 वर्षात काय केलं ते सांगा
70 वर्षात काय केलं असा सवाल केंद सरकार करत आहे. त्यांनी हे तुणतुणं वाजवणं बंद करावं आणि 7 वर्षात काय केलं हे सांगावे. 70 वर्षांत देशाने जे काही उभं केलं, ते या भाजप सरकारने विक्रीला काढलं आहे. केवळ उद्योगपतींसाठी काम करणाऱया सरकारला जनताच उत्तर देईल, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.