ऑनलाईन टीम / वर्धा :
वर्धा जिह्यातील हिंगणघाट येथे एका महिलेवर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा निषेधार्थ आज वर्धा बंद पुकारण्यात आला आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. यामध्ये जिह्यातील शाळा, महाविद्यालये, व्यवसायिक प्रतिष्ठाने, राजकीय पक्ष आणि विविध सामाजिक संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत.
तसेच आज सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाजवळून मोर्चा काढण्यात येणार आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी, फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जाणार आहे.
दरम्यान, हिंगणघाट इथे 3 फेब्रुवारी रोजी विकेश नगराळे या नराधमाने पेट्रोल टाकून तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे पडसाद संबंध देशभर उमटत आहेत.