ग्रामपंचायत विकास अधिकाऱयांना निवेदन
वार्ताहर / हिंडलगा
हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील भटक्या व बेवारस कुत्र्यांना बंदोबस्त करून ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी सामाजिक कार्यकर्ते रमाकांत पावशे यांनी ग्रामपंचायत विकास अधिकाऱयांना निवेदन दिले.
ग्रामपंचायत अधिकाऱयांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नगरांचा व वसाहतींचा विस्तार झपाटय़ाने वाढत आहे. प्रत्येक घरातील कचरा प्लास्टिक टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणे कठीण जात आहे. याशिवाय परिसरातील मटण, चिकन व मासे विक्री दुकानांमुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे भटक्या व बेवारस कुत्र्यांचे अनेक कळप निर्माण झाले असून रस्त्यावर झोपणे, जोरात भुंकणे, लहान मुलांच्या अंगावर धावून जाणे, असे प्रकार घडत आहेत. तसेच बेळगाव वेंगुर्ला महामार्गावरून अचानक हे कुत्रे आडले आल्याने लहान मोठे अपघात होत आहेत. शिवाय शिवारातील पिकांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या अधिकऱयांनी त्वरित लक्ष देऊन कार्यक्षेत्रातील सर्व भटक्या व बेवारस कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना होणार त्रास कमी करावा, अशी मागणी रमाकांत पावशे यांनी केला आहे.