वार्ताहर/ हिंडलगा
हिंडलगा ग्राम पंचायत निवडणुकीसाठी ग्रामविकास लोकशाही आघाडीतर्फे विविध वॉर्डातून निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांना मतदार आणि ग्रामस्थांचा भरघोस पाठिंबा मिळाला असून आघाडीतील सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यामुळे आघाडीतील उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे.
हिंडलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील विविध नागरी समस्या सोडवून एक आदर्श आणि निर्मलग्राम बनविण्याच्या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्राम पंचायत अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक अशी हिंडलगा ग्रामविकास लोकशाही आघाडीची स्थापना केली आहे. त्यामार्फत पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 1 मधून कल्लाप्पा ऊर्फ सतीश काकतकर, रेणुका अष्टेकर, वॉर्ड क्रमांक 2 मधून रामचंद्र मन्नोळकर, अजय मास्ते, आरती कडोलकर, सुमन राजगोळकर, वॉर्ड क्रमांक 4 मधून चंद्रकांत बांदिवडेकर, दीपा हंगिरगेकर, नागेश मन्नोळकर, वॉर्ड क्रमांक 5 मधून रेणु गावडे, नितीनसिंह राजपूत, मीनाक्षी हित्तलमनी, सीमा देवकर, वॉर्ड क्रमांक 9 मधून ज्युली बेनद्दस्वामी, रवि गायकवाड, वॉर्ड क्रमांक 11 मधून प्रभूकुमार पुजार, रुपा उरणकर, स्वाती वेसणे, तसेच वॉर्ड क्रमांक 12 मधून अनिल मद्यापगोळ, पूजा जगताप व स्नेहल कोलेकर हे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. या सर्व उमेदवारांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतले असून पंचायतीत चाललेला भ्रष्टाचार नष्ट करून स्वच्छ आणि विकासाभिमुख कारभार चालविण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे परिसरातील मतदारांनी देखील ग्रामविकास लोकशाही आघाडीतील उमेदवारांवरच आपला विश्वास दाखवत प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.
मतदारांच्या गाठीभेटीवर भर
रविवारी (दि. 20) निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने हिंडलग्यासह विजयनगर, गोकुळनगर, श्रीनाथनगर, मास्ती कॉलनी, बॉक्साईट रोड, कलमेश्वरनगर, समर्थ कॉलनी, लक्ष्मीनगर, सिंडिकेट कॉलनी आदी परिसरात भव्य प्रचारफेरी काढून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या.
रामचंद्र मन्नोळकर, माजी ग्रा. पं. अध्यक्ष
हिंडलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्राच्या विकासासाठी आम्ही अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. आमच्या कार्यकाळात नागरिकांसाठी शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा, रस्ते, गटारींची योग्यरीत्या सोय केली आहे. पंचायतीला निर्मल ग्राम पुरस्कार मिळवून दिला आहे. कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी कचरागाडीची सोय केली आहे. नागरिकांना अत्यावश्यक कागदपत्रांसाठी सरकारी शुल्क किती असावे, याचे दरपत्रक लावण्याचा ठराव पास केला होता. पण मागील सत्ताधारी गटाने आपली मनमानी चालविण्यासाठी त्याची अंमलबजावणी केली नाही. याचा फटका नागरिकांना बसला असून आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे पारदर्शक कारभार चालवून नागरिकांची होणारी लूट थांबविण्यासाठी यावेळी ग्रामस्थांनी ग्रामविकास लोकशाही आघाडीच्या पाठिशी ठाम राहून प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहनही रामचंद्र मन्नोळकर यांनी केले आहे.