गावात पाहणीदौरावेळी जिल्हाधिकाऱयांचा आदेश
वार्ताहर/ हिंडलगा
हिंडलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रविवार दि. 13 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सोमवार दि. 21 जूनपर्यंत आठ दिवस संपूर्ण ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. एम. जी. हिरेमठ यांनी दिला आहे. त्यानुसार ग्रामस्थांनी व व्यापाऱयांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेऊन शासनाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन ग्राम पंचायतीतर्फे करण्यात आले आहे.
हिंडलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात आतापर्यंत 270 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 19 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाची ही वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी हिंडलगा ग्राम पंचायत व प्रशासनातर्फे गावामध्ये वारंवार सॅनिटायझर फवारणी, व्हॅक्सिन पुरवठा व जनजागृतीही करण्यात येत आहे. तरीदेखील दैनंदिन रुग्णांची संख्या वाढतच असल्याने ग्राम पंचायतीतर्फे जिल्हाधिकाऱयांना हिंडलग्यासाठी अधिक प्रमाणात व्हॅक्सिनचा पुरवठा करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. एम. जी हिरेमठ, पोलीस उपायुक्त विक्रम आमटे, प्रांताधिकारी करलिंगण्णावर, तहसीलदार आर. के. कुलकर्णी, आरोग्याधिकारी मास्तीहोळी यांनी शनिवार दि. 12 रोजी हिंडलगा गावाला सर्व फौजफाटय़ानिशी भेट दिली.
याप्रसंगी त्यांनी ग्राम पंचायतीला भेट देऊन अधिकारी व अध्यक्षांशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर पायी चालत संपूर्ण गावामध्ये पाहणी केली. त्यांना कोरोनाबाबत परिस्थिती अत्यंत गंभीर वाटल्याने आरोग्य अधिकारी व पंचायत सदस्यांशी सविस्तर चर्चा करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गावामध्ये कडकडीत लॉकडाऊन करणे अनिवार्य असल्याचे सांगितले. त्यामुळे ग्राम पंचायतीने जिल्हाधिकारी डॉ. एम. जी. हिरेमठ व पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांच्या आदेशानुसार रविवार दि. 13 पासून सोमवार दि. 21 जूनपर्यंत ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
सहकार्य करण्याचे आवाहन
या आठ दिवसांच्या लॉकडाऊन कालावधीत हिंडलगा गावासह कार्यक्षेत्रातील विजयनगर, लक्ष्मीनगर, गोकुळनगर, श्रीनाथनगर, कलमेश्वरनगर, समर्थनगर कॉलनीसह संपूर्ण परिसरातील मेडिकल दुकाने, दवाखाने व दूध विक्री केंद्रे वगळता इतर सर्व किराणा दुकाने, भाजीपाला विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर नियमांचे उल्लंघन करताना कोणीही सापडल्यास 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. कोणीही विनामास्क फिरताना आढळल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती ग्राम पंचायतीने दिली आहे. गावातील सर्व नागरिक, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, बार मालक, भाजी विक्रेत्यांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन ग्राम पंचायतीने केले आहे.