वार्ताहर / सांबरा
हिंडाल्को कंपनीच्या आवारातून गेलेला रस्ता नागरिकांसाठी बंद केल्याने कणबर्गी भागातील शेतकरी व कामगारवर्गाची गैरसोय होत आहे. हिंडाल्को कंपनीच्या अधिकाऱयांनी हा रस्ता त्वरित खुला करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
कणबर्गी परिसरातून एपीएमसी भाजी मार्केटला जाण्यासाठी हिंडाल्को कंपनीच्या आवारातून गेलेला रस्ता अत्यंत सोयीस्कर व जवळचा आहे. तसेच काकती, होनगा भागातील औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठीदेखील कामगारांना हा रस्ता जवळचा आहे. मात्र, बुधवारपासून हा रस्ता कोविड-19 चे कारण पुढे करून बंद केल्याने शेतकरीवर्ग व कामगारवर्गांची गैरसोय होत आहे. शेतकऱयांना आपला भाजीपाला घेऊन जाण्यासाठी बेळगाव शहराला वळसा घालून भाजी मार्केट गाठावे लागत आहे. यामुळे आठ ते नऊ किलोमीटर अंतर जावे लागत आहे. कामगारवर्गाची हीच परिस्थिती झाली आहे. अशाने शेतकरी व कामगारांच्या वेळेचा व पैशांचा अपव्यय होत आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या कोविडच्या नियमांचे पालन करणे जरुरीचे आहे. म्हणून काय रस्ताच बंद करायचा? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तरी शेतकरी व कामगारवर्गाच्या गैरसोयींची दखल घेऊन अधिकाऱयांनी हा रस्ता तातडीने खुला करावा, अशी मागणी शेतकऱयांच्यावतीने माजी महापौर शिवाजी सुंठकर, संजय इनामदार, किसन सुंठकरसह ग्रामस्थांनी केली आहे.