सरसंघचालक मोहन भागवतांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / ग्वाल्हेर
हिंदू अन् भारत वेगळे असू शकत नाहीत. भारताला भारत रहायचे असल्यास भारताला हिंदू रहावे लागणार आहे. हिंदूला हिंदू म्हणून रहायचे असल्यास भारताला अखंड व्हावे लागणार आहे. हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नसल्याचे उद्गार सरसंघचालक मोहन भागवत यांनी मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर येथे शनिवारी बोलताना काढले आहेत.
भारताची फाळणी झाली, पाकिस्तान तयार झाला, कारण आम्ही हिंदू आहोत या भावनेचा तेथील मुस्लिमांना विसर पडला. स्वतःला हिंदू मानणाऱयांची शक्ती प्रथम कमी झाली, मग संख्या कमी झाली याचमुळे पाकिस्तान भारत राहिला नाही. हा हिंदुस्थान असुन येथे परंपरेने हिंदू लोक राहत आले आहेत. ज्या ज्या गोष्टीला हिंदू म्हणतो, त्या सर्व गोष्टींचा विकास याच भूमीत झाला आहे. भारताच्या सर्व गोष्टी याच भूमीशी जोडलेल्या आहेत असे सरसंघचालकांनी म्हटले. संघाच्या मध्य भारत प्रांताच्या चार दिवसीय स्वर साधक संगमात सामील होण्यासाठी ते शुक्रवारी ग्वाल्हेर येथे पोहोचले होते.
देशाची फाळणी ही कधीच न संपणारी वेदना आहे. फाळणी रद्द झाल्यावरच या वेदनेपासून मुक्ती मिळेल. माझा जन्म फाळणीनंतर झाला, त्यामुळे फाळणी समजुन घेण्यासाठी बालपणातील काही वर्षे गेली. स्वातंत्र्यासाठी अनेक बलिदान करावे लागलेल्या मातृभूमीची फाळणी झाल्याचे दीर्घ अध्ययनानंतर उमगले. भारत हा जमिनीच तुकडा नसून आमची मातृभूमी आहे. संपूर्ण जगाला काहीतरी देण्यास आम्ही पात्र होऊ तेव्हाच फाळणी हटणार आहे. हा राजकारण नव्हे तर आमच्या अस्तित्चाचा विषय आहे. अखंड भारत निर्माण करणे हे आमचे राष्ट्रीय आणि धार्मिक कर्तव्य आहे. फाळणी इस्लामिक आक्रमण, इंग्रजांच्या आक्रमणाचे फळ आहे. भारताच्या उत्थानात धर्माचे नेहमीच स्थान राहिले असल्याचे सरसंघचालकांनी नोएडा येथे बोलताना म्हटले होते.
हे 1947 नव्हे तर 2021 असून आता फाळणी शक्य नाही. भारत फाळणी विसरणार नाही. आता फाळणीचा प्रयत्न करणाऱयांचे नुकसान होईल हा माझा आत्मविश्वास आहे. हिंदू समाजाला संघटित होण्याची आवश्यकता आहे. आम्ही तडजोड केल्यानेच फाळणी झाली. वैविध्यात एकता असल्याचे आमची संस्कृती म्हणते, याचमुळे मुस्लिम राहणार नाहीत असे हिंदू म्हणूच शकत नाहीत. सर्व जण मिळून शिस्तीत राहतील हीच आमची संस्कृती आहे. शिस्तीचे पालन सर्वांना करावे लागणार असल्याचे ते म्हणाले होते.