हिंदू एकता महाकुंभात सरसंघचालकांचे आवाहन
वृत्तसंस्था / चित्रकूट
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी बुधवारी चित्रकूटमध्ये हिंदू एकता महाकुंभाला संबोधित केले आहे. कलयुगात एकता हीच शक्ती असल्याने आम्हाला अहंकार, स्वार्थ सोडून काम करावे लागणार असल्याचे म्हणत सरसंघचालकांनी हिंदू संस्कृतीचे संरक्षण आणि हिंदू धर्मातून बाहेर पडलेल्या लोकांच्या घरवापसीसाठी संकल्प घ्यायला लावला आहे.
हिंदू धर्म सोडून गेलेल्या बंधूभगिनींची घरवापसी करविण्यात यावी आणि त्यांना स्वतःच्या कुटुंबाचा हिस्सा करावे. तसेच आता कुणाला हिंदू धर्मापासून दूर होऊ देऊ नये असा संकल्प महाकुंभमध्ये उपस्थित लोकांना घेण्यास त्यांनी सांगितले आहे. तसेच हिंदूंना हिंदू बहिणींच्या अस्मिता आणि गौरवाचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा घ्यायला लावली आहे. आम्ही हिंदूंच्या हितांचे रक्षण करण्यास सुरुवात केली आहे. अयोध्या, काशीनंतर आता मथुरेसाठी चळवळीची वेळ आली असल्याचे उद्गार जगद्गुरु रामभद्राचार्य महाराज यांनी काढले आहेत. या महाकुंभमध्ये हिंदूंवर होणारा अन्याय, मठ-मंदिरांची सुरक्षा, धर्मांतर रोखणे, लोकसंख्या नियंत्रण, राष्ट्रवाद आणि समान नागरिकत्व संहिता, लव्ह जिहाद, सामाजिक समरसता इत्यादी मुद्दय़ांवर चर्चा झाली.