महात्मा गांधी हिंदू होते तर गोडसे हिंदुत्ववादी
वृत्तसंस्था/ जयपूर
काँग्रेस नेते राहुल गांधींनी रविवारी जयपूरमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय सभेत मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पूर्ण देश 4-5 उद्योजकांच्या हातात आहे. प्रत्येक संस्था एका संघटनेच्या हातात आहे. मंत्र्यांच्या कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ओएसडी आहेत. देशाला जनता नव्हे तर 3-4 भांडवलदार चालवत आहेत आणि आमचे पंतप्रधान त्यांचे काम करत आहेत. मी हिंदू असलो तरीही हिंदुत्ववादी नसल्याचे विधान राहुल यांनी सभेत बोलताना केले आहे. या सभेला पक्षाध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित होत्या, परंतु त्यांनी भाषण केले नाही.
दोन शब्दांचा एकच अर्थ असू शकत नाही, प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ असतो. देशाच्या राजकारणात आज दोन शब्दांचे अर्थ वेगळे आहेत. एक शब्द हिंदू तर दुसरा शब्द हिंदुत्ववादी आहे. ही एक गोष्ट नसून दोन वेगळे शब्द आहेत आणि त्यांचा अर्थ अत्यंत वेगवेगळे आहेत. मी हिंदू असलो तरीही हिंदुत्ववादी नाही. महात्मा गांधी हिंदू होते आणि नथुराम गोडसे हिंदुत्ववादी होते असे राहुल म्हणाले.
हिंदू आणि हिंदुत्ववादीमध्ये फरक आहे. हिंदू सत्य शोधतो, प्रसंगी मरण पत्करूनही सत्याचा शोध घेतो. तर हिंदुत्ववादी पूर्ण जीवन सत्तेचा शोध आणि सत्ताप्राप्तीत घालवतो. सत्तेसाठी तो कुणालाही मारू शकतो. हिंदूचा मार्ग सत्याग्रह तर हिंदुत्वाद्याचा मार्ग सत्ताग्रह असतो. हा देश हिंदूंचा आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही. महागाई आणण्याचे काम हिंदुत्ववाद्यांनीच केले आहे. नरेंद्र मोदी हिंदुत्ववादी असल्यानेच त्यांनी पाठीत सुरा खुपसला आहे. हिंदू समोरून मारतो, मागून वार करत नाही. हिंदुत्ववादी भय दाखवितो, धमकावितो पण मी घाबरणारा नसल्याचा युक्तिवाद राहुल यांनी केला आहे.
शेतकऱयांना भेटणे टाळले
सभेत बोलताना प्रियांका वड्रा यांनी केंद्र सरकार आणि भाजपच्या धोरणांवर प्रखर टीका केली. केंद्र सरकार जनतेसाठी काम करत नसून मोजक्या उद्योजकांसाठी काम करतेय. केंद्रातील सरकार खोटारडे आणि लूट करणारे आहे. पंतप्रधान मोदींनी जगभ्रमंती केली, पण त्यांना दिल्लीत शेतकऱयांशी चर्चा करण्यासाठी जाता आले नाही. निवडणूक जवळ येताच भाजप जात, धर्म, चीन-पाकिस्तानचा मुद्दा उकरून काढू लागतो असा आरोप प्रियंका वड्रा यांनी केला आहे.
गेहलोतांकडून मोदी लक्ष्य
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. सर्व राज्य सरकारे आर्थिक संकटात असून केंद्राने मौन बाळगले आहे. विकास राज्य सरकार करणार, संकटात राज्य सरकार महत्त्वाची भूमिका बजावते, कोरोनाचे संकट हाताळण्यास राजस्थान अग्रणी राहिला. मुख्यमंत्र्यांच्या पत्रांना प्रतिसाद न देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत असे गेहलोत म्हणाले.