सरसंघचालक मोहन भागवतांचे विधान : ओवैसी यांच्याकडून लक्ष्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एखादा व्यक्ती हिंदू असल्यास तो देशभक्त असणारच, असे उद्गार सरसंघचालक मोहन भागवत यांनी काढले आहेत. माझ्या देशभक्तीची उत्पत्ती माझ्या धर्मातून झाल्याची टिप्पणी महात्मा गांधी यांनी केली होती. याचाच दाखला देत भागवतांनी संबंधित विधान केले आहे.
एआयएमआयएम प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विट करत भागवत यांना लक्ष्य केले आहे. गांधी यांचे मारेकरी गोडसेविषयी काय सांगाल? नेल्ली नरसंहार, 1984 शिखविरोधी दंगली आणि 2002 च्या गुजरात नरसंहारासाठी जबाबदार लोकांसाठी काय म्हणणे आहे, अशी विचारणा ओवैसी यांनी केली आहे.
एका धर्माच्या अनुयायांना भागवत देशभक्तीचे प्रमाणपत्र प्रदान करत आहेत, तर दुसऱया धर्माच्या लोकांना येथे राहण्याचा आणि स्वतःला भारतीय म्हणण्याचा अधिकार असल्याचे सिद्ध करण्यासाठी जीवनभर झटावे लागत असल्याचे ओवैसी यांनी म्हटले आहे.
जे.के. बजाज आणि एम.डी. श्रीनिवास यांनी लिहिलेले पुस्तक ‘मेकिंग ऑफ द हिंदू पॅट्रियट : बॅकग्राउंड ऑफ गांधीजी हिंद स्वराज’चे प्रकाशन करताना भागवत यांनी उपस्थितांना संबेधित केले होते. हे पुस्तक व्यापक संशोधनावर आधारित असून याहून वेगळे मत असणारेही संशोधन करून ते जगासमोर मांडू शकतात असे भागवत म्हणाले.
माझी देशभक्ती माझ्या धर्मातून प्राप्त झालेली आहे. मी स्वतःचा धर्म समजून चांगला देशभक्त होईन आणि लोकांनाही असे करण्यास सांगणार आहे. स्वराज्य समजण्यासाठी स्वधर्म समजून घ्यावा लागेल असे गांधी म्हणाले होते. हिंदू असेल तर त्याला देशभक्त व्हावेच लागेल कारण त्याची मूळ भावना हीच आहे. निद्रिस्त असल्यास त्याला जागे करावे लागेल, परंतु कुठलाच हिंदू भारतविरोधी असू शकत नसल्याचेभागवत यांनी नमूद केले आहे.
वेगळा असण्याचा अर्थ आम्ही एक समाज, एका भूमीचे पुत्र होऊन राहू शकत नाही असा होत नाही. एकतेत अनेकता आणि वैविध्यात एकता हाच भारताचा मूलमंत्र असल्याचे ते म्हणाले.