मुंबई/प्रतिनिधी
ज्येष्ठ कवी, गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली आहे. आरएसएस, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि तालिबान या संघटनांच्या ध्येय्यामध्ये कोणताही फरक नाही. त्यामुळे आरएसएसचे समर्थन करणाऱ्या लोकांनी आत्मपरिक्षण करावे, तसेच असे परखड मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केले आहे. यावर भाजप आमदार अतुल भातखळकरांनी जावेद अख्तरांना आव्हान केलं आहे.
जावेद अख्तर यांनी या संघटना भारतीय संविधान त्यांच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, पण जर संधी मिळाली तर ते सीमा ओलांडतील असे जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. त्यावर आता सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जावेद अख्तर यांच्यावर टीका करत जावेद अख्तर यांनी आपले विधान मागे घ्यावे असे म्हटले आहे. तसेच ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांनी केलेले वक्तव्य सर्रास चुकीचे असल्याची प्रतिक्रिया भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिली आहे. यापुढे असे वक्तव्य केल्यास त्यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा सुद्धा अतुल भातखळकर यांनी दिली आहे.
“आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद सुद्धा तालिबानी मानसिकतेचे आहेत हे जावेद अख्तर यांचं विधान म्हणजे केवळ बेशरमपणाचा कळस नसून समस्त हिंदू समाजाचा हा अपमान आहे. जावेद अख्तर यांनी आपले हे विधान मागे घ्यावे. तसेच जावेद अख्तर हे विसरत आहेत की, या हिंदू समाज बहुसंख्य असलेल्या देशात राहून ते तालिबानवर टीका करत आहेत. हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये जा आणि तालिबानवर टीका करा. त्यामुळे जावेद अख्तर आपलं विधान मागे घ्यावे आणि समस्त हिंदू समाजाची क्षमा मागावी नाहीतर तुमच्या विरोधामध्ये बदनामीचा खटला केला जाईल,” असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.