विक्रम पाटील यांचे राष्ट्रवादी नगरसेवकांना; आव्हान : राज्यातील सत्तेचा वापर विकास रोखण्यासाठी : निधीचा हिशोब गांधी चौकात
देण्याची तयारी
प्रतिनिधी/इस्लामपूर
महाराष्ट्रात सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीने सत्तेचा उपयोग विकास कामे थांबविण्यासाठी केला आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नगरसेवक हे अकार्यक्षम असून ते शहराचा विकास करू शकत नाहीत. निधीचा आणि विकास कामांचा लेखा-जोखा मांडण्यासाठी आमची गांधी चौकात येण्याची तयारी आहे. राष्ट्रवादीने सर्व नगरसेवक घेवून यावे, राष्ट्रवादीने आगामी नगरपालिका निवडणूक हिंमत असेल तर पालकमंत्री जयंत पाटील यांच्या शिवाय लढवावी, असे आव्हान विकास आघाडीचे पक्षप्रतोद विक्रम पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिले.
पाटील पुढे म्हणाले, शहाजी पाटील हे निधीचा हिशोब मागत आहेत. त्यांनी कधीपण तारीख व वेळ निश्चित करावी, कुणी किती निधी आणला, कुणी किती विकास कामे केली याचा हिशोब जनतेसमोर देऊ. आमच्या ५ वर्षाच्या कारकिर्दीत रू. १२३ कोटी ३७ लाख ३३ हजार ५८७ रूपये निधी आणला आहे. तर त्यांच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत १७९ कोटी ५३ लाख ९७ हजार ०९५ रूपये एवढा निधी प्राप्त झाला आहे. संजय कोरे हे राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. पण ते नगराध्यक्ष यांच्या सानिध्यात होते. सभागृहामध्ये ते नेहमी पाठीमागे बाकावर बसत होते. राज्यात सत्ता आल्यानंतर पुढील बाकावर बसत आहेत. त्यांना स्वत:च्या प्रभागाचा विकास करता आलेला नाही. त्यांना शहराच्या विकासाच्या बाबतीत बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांच्याच प्रभागातील अनेक वर्षे प्रलंबित असणारे रस्ते कोल्हापूर रोड ते वाघवाडी रोड व कामेरी रोड हे आमच्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये मंजूरी आणून आम्ही पूर्ण केले. खंडेराव जाधव यांचा आमच्या सत्ताकाळामध्ये अनेक ठराव बेकायदेशीर झाल्याचा आरोप आहे.
ठराव बेकायदेशीर होत असताना राष्ट्रवादीचे नगरसेवक सभागृहामध्ये काय करीत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या नगरसेवकांनी नवीन घर खरेदी केल्यानंतर नगरपालिकेमध्ये वार्डडबुकाला नाव लावण्यासाठी खरेदीपत्राच्या २ टक्के अन्यायी कर लावलेला होता. तो आम्ही रद्द केला. भुयारी गटर, २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना, भाजीपाला मार्केट त्यांना त्यांच्या काळात मंजूरीही घेता आली नाही. आरक्षण टाकण्याची भिती दाखवण्याचा उद्योग राष्ट्रवादीने केला आहे. सध्या शिवसेनेने आणलेला ११ कोटींच्या निधीला विरोध करुन विकास कामात खिळ घातली जात आहे. तर मुख्याधिकाऱ्यांना हाताशी धरुन भुयारी गटारचे काम थांबवण्याचे पाप राष्ट्रवादी करीत आहे. यावेळी शिवसेनेचे गटनेते आनंदराव पवार, विकास आघाडीचे उपाध्यक्ष नगरसेवक वैभव पवार, शकील सय्यद प्रदीप लोहार हे उपस्थित होते.
म्हणून काम बंद पाडले
यावेळी बोलताना शिवसेनेचे गटनेते आनंदराव पवार म्हणाले, भुयारी गटार योजनेचे पाठीमागील काळात काम शिवसेनेने बंद पाडल्याचा आरोप राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे यांनी केला आहे. त्यांचे आता वय झाले असून त्यांना आठवत नाही, काही ठिकाणी पाणी पाईप लिकेज झाल्या होत्या. त्याचे लिकेज संबंधीत ठेकेदार काढत नव्हते. त्यामुळे शिवसेनेने काही काळ हे काम रोखले होते. त्यासाठी नगराध्यक्षांच्या दालनात बैठक झाली. त्यावेळी कोरे उपस्थित होते. त्यांनीही त्यावेळी लिकेज काढून देण्याबाबत सहमती दर्शवली होती. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये, असा इशारा देतानाच पुढील काळातही शिवसेना व विकास आघाडीचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.