ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातील सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पार्ट टाईम मुख्यमंत्री आहेत. ते कधी झोपतात, कधी उठतात आणि कधी काय करतात हे कोणाला सांगता येत नाही. राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा एक फुलटाईम मुख्यमंत्री हवा आहे. हिंमत असेल तर महाराष्ट्रात विधानसभा बरखास्त करून निवडणुका घ्या, असे आव्हान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी टी रवी यांनी दिले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक मंगळवारी मुंबईत पार पडली. यावेळी रवी बोलत होते. ते म्हणाले, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून दिले. भाजपला सत्तेत बसवण्याचा कौल जनतेने दिला होता. मात्र, त्यावेळी भाजपसोबत युती असणाऱ्या शिवसेनेने जनतेला दगा देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले. हे पार्ट टाईम मुख्यमंत्री आहेत. राज्याला फडणवीस यांच्यासारखे फुल टाईम मुख्यमंत्री हवेत. हिंमत असेल तर विधानसभा बरखास्त करुन निवडणुका घ्या. कोण विजयी होईल, ते कळेलच, असे आव्हान रवी यांनी दिले.
या बैठकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.