मुख्यमंत्र्यांकडून बळींच्या परिवाराला आर्थिक मदतीची घोषणा
कोलकाता / वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात वाढलेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने नेमलेले चार सदस्यांचे पथक पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले आहे. घडलेल्या हिंसाचाराची सखोल चौकशी हे पथक करणार आहे. राज्यात गेल्या चार-पाच दिवसात 16 जणांचा हिंसाचारात मृत्यू झाला आहे. या हिंसाचारावरून सध्या भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असल्यामुळे राजकीय वातावरणही तप्त झालेले आहे.
पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी तातडीने राज्याचा दौरा केला. तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर राज्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना हिंसाचाराचा सामना करावा लागत असल्याचे जे. पी. नड्डा यांनी सांगितले. बंगालमधील हिंसाचार हा देशाच्या फाळणीवेळच्या हिंसाचाराचे स्मरण करून देणारा असून, स्वातंत्र्योत्तर काळात मी असा हिंसाचार कधी पाहिला नाही, असेही नड्डा म्हणाले होते. त्यामुळे या घटना आता वादाचा मुद्दा ठरत आहेत. दुसरीकडे, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून भाजप कार्यकर्त्यांवर हिंसाचार पसरवण्याचा आणि अफवा पसरवल्याचा ठपका ठेवला जात आहे.
बळींच्या परिवाराला प्रत्येकी 2 लाख मदत
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचारप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या हिंसाचारामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या परिवाराला प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. ही भरपाई देताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नसल्याचेही मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे. या हिंसाचारात एकूण 16 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तृणमूल काँग्रेस, भाजप आणि संयुक्त मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला
राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत असतानाच केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या वाहनताफ्यावर हल्ल्याची घटना घडली आहे. वेस्ट मिदनापोर जिल्हय़ातील पंचकुरी गावात त्यांच्या कारवर अज्ञातांनी हल्ला केला. हिंसाचारात बळी-जखमी झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी व्ही. मुरलीधरन गेले असताना हा प्रकार घडला आहे. या हल्ल्यात ‘तृणमूलचे गुंड’ सहभागी असल्याचा दावा मुरलीधरन यांनी ट्विटमध्ये केला आहे. या हल्ल्यातून आपण सुरक्षित असलो तरी कारचालक जखमी झाला असून कारचे नुकसान झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयात याचिका पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि बलात्काराच्या घटनांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपचे नेते गौरव भाटिया यांनी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे केली. हिंसाचार घडविणाऱयांवर काय कारवाई झाली, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.