संसदेत राष्ट्रपतींचे अभिभाषण -प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारावरून कडक शब्दात ताशेरे
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला शुक्रवारपासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने प्रारंभ झाला. नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उल्लेख केला. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाच्या अपमानाची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. तसेच केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांचे कौतुक करतानाच राष्ट्रपतींनी शेतकऱयांसाठीही हे कायदे फायद्याचेच असल्याचा दावा केला.
कृषी कायद्याविरोधात शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. शेतकऱयांच्या आंदोलनाला वेगळे वळण लागल्याने यावर सर्वत्र टीका केली जात असतानाच आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही भाष्य केले. ‘तिरंगा आणि प्रजासत्ताक दिन यासारख्या पवित्र दिवसाचा अपमान सहन केला जाणार नाही’, असा इशाराच राष्ट्रपतींनी दिला आहे. कृषी कायद्यांसंबंधी बोलताना तिन्ही कृषी कायदे तयार होण्यापूर्वी जे काही पूर्वीचे अधिकार, सुविधा होत्या, त्यामध्ये कोणत्याही प्रकारे बदल केलेला नाही. पण या कृषी सुधारणांच्या माध्यमातून शेतकऱयांना नव्या सुविधा देण्यासोबतच नवे अधिकारही सरकारकडून देण्यात आले आहेत, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रपतींनी दिली. कृषी क्षेत्राला अधिक लाभ देण्यासाठी सरकार कृषी क्षेत्रात आधुनिक पायाभूत सुविधांवर काम करत आहे, असेही राष्ट्रपतींनी अभिभाषणात सांगितले.
संसदेच्या दोन्ही सभागृहात झालेल्या सखोल चर्चेनंतर सात महिन्यांपूर्वी तीन कृषी कायदे करण्यात आले. या कृषी सुधारणांचा फायदा 10 कोटी पेक्षा जास्त छोटय़ा शेतकऱयांना तात्काळ मिळणे सुरू झाले आहे. छोटय़ा शेतकऱयांना होणारा फायदा लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी वेळोवेळी या सुधारणांना पाठिंबा दिला होता, असेही राष्ट्रपतींनी स्पष्ट केले. सध्या या कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सरकार सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करून त्याचे पालन करेल. कृषी कायद्यांबद्दल शेतकऱयांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, असेही ते पुढे म्हणाले.
कोरोनाविरोधी लढय़ाची वाहव्वा
अभिभाषणात राष्ट्रपतींनी कोरोना आणि इतर संकटांचा उहापोह करताना केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांचे आणि लसीकरण मोहिमेचेही कौतुक केले. सरकारने योग्यवेळी घेतलेल्या निर्णयांमुळे लाखो भारतीयांचे प्राण वाचल्याचे सांगत राष्ट्रपतींनी सरकारची वाहव्वा केली.
हे अधिवेशन उज्ज्वल भविष्य निश्चित करेल- मोदी
‘दशकातील हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वतंत्र्यसैनिकांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.’ अशी स्पष्टोक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला संसदेत प्रवेश करताना दिली. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे दशक महत्त्वपूर्ण आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन भारताचे उज्ज्वल भविष्य निश्चित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1 फेबुवारीला अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला संसदेत सादर केला जाणार असून यावेळी हा अर्थसंकल्प प्रथमच कागदविरहीत स्वरूपात सादर करण्यात येणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. याप्रसंगी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासाठी निर्माण केलेल्या एका मोबाईल ऍपचे उद्घाटन केले आहे. अर्थसंकल्पविषयक सर्व माहिती या ऍपमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्थमंत्र्यांचे 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतर मोबाईल ऍपवर याबाबतची सर्व कागदपत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सर्वांचे समाधान करणारा अर्थसंकल्प मांडण्याचे मोठेच आव्हान सरकारपुढे आहे.