नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
जेएनयू विद्यार्थीसंघ अध्यक्ष आइशी घोष, पंकज आणि वास्कर विजय यांची 5 जानेवारी रोजी विद्यापीठ परिसरात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. जेएनयूमधील विद्यार्थ्यांची निदर्शने केवळ शुल्कवाढीसंबंधी करण्यात आलेले आंदोलन होते असे म्हणणे चुकीचे आहे. प्रत्यक्षात हा जेएनयूवरील नक्षली हल्ला होता. याची पार्श्वभूमी 20 ऑक्टोबर रोजीच तयार करण्यात आली होती असा दावा अभाविपच्या राष्ट्रीय महासचिव निधी त्रिपाठी यांनी केला आहे.
जेएनयू हिंसाचारासंबंधी चर्चा होत असली तरीही ती केवळ 5 जानेवारी रोजी घडलेल्या घटनेपुरती मर्यादित करण्यात आली आहे. पण प्रत्यक्षात हा प्रकार त्याहून अधिक मोठा आहे. 28 ऑक्टोबर 2019 पासून 5 जानेवारी 2020 पर्यंत विद्यापीठ परिसरात काय-काय घडले हे अभ्यासणे गरजेचे असल्याचे त्रिपाठी यांनी म्हटले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी
5 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली आहे. हिंसाचाराचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे निर्देश देण्याची मागणी तीन प्राध्यापकांनी केली होती. या प्रकरणी न्यायालयाने पोलीस, दिल्ली सरकार, व्हॉट्सऍप, ऍपल आणि गुगलकडून मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत स्पष्टीकरण मागविले आहे. जेएनयू प्रशासनाकडून हिंसाचाराचे चित्रण सुरक्षित ठेवण्यासंबंधी उत्तर मिळालेले नाही असे दिल्ली पोलिसांनी सुनावणीवेळी सांगितले आहे.
प्राध्यापकांना मार्गदर्शक सूचना
जेएनयू प्रशासनाने सोमवारी प्राध्यापकांना मार्गदर्शक सूचना करत विद्यार्थ्यांच्या हिताकरता वर्ग पुन्हा सुरू करावेत असे सांगितले आहे. जेएनयू प्राध्यापक संघाच्या दोन पदाधिकाऱयांनी असहकाराची घोषणा केल्याने या सूचना करण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. प्राध्यापकांच्या असहकारामुळे शैक्षणिक कार्यक्रमांना अडथळा होत आहे. परिसरातील स्थिती सुरळीत होणे अवघड ठरत आहे. विद्यापीठाचे दैनंदिन कामकाज रोखण्याचा प्राध्यापकांचा कुटिल हेतू यातून स्पष्ट होत आहे.
निदर्शनांच्या आड हल्ल्याचा कट?
4 दहशतवाद्यांना 8 दिवसांची कोठडी, पोलीस अन् नेत्यांवर हल्ल्याचा होता कट
नवी दिल्ली : इस्लामिक स्टेट या क्रूर दहशतवादी संघटनेच्या मॉडय़ूलशी संबधित 4 दहशतवाद्यांची कोठडीत दिल्लीच्या पतियाळा हाउस न्यायालयाने 8 दिवसांची वाढ केली आहे. या दहशतवाद्यांपैकी एकाला गुजरातच्या वडोदरा येथे अटक करण्यात आली होती. तर उर्वरित तीन दहशतवाद्यांना दिल्लीच्या वजीराबाद भागातून पकडण्यात आले होते.
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांच्या आड हल्ला घडवून आणण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता. या चारही जणांनी 100 काडतूसे आणि शस्त्रास्त्रs खरेदी केली होती. 4 ही दहशतवाद्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. 7 राज्यांमध्ये पोलीस अधिकारी तसेच हिंदुत्ववादी नेत्यांवर हल्ला करण्याचा त्यांचा कट होता. निरीक्षक स्तराच्या पोलीस अधिकाऱयांवर हल्ला करण्याचा कट त्यांनी रचला होता. अशा अधिकाऱयांना सुरक्षा मिळत नाही. पश्चिम उत्तरप्रदेश, कर्नाटक आणि केरळमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणले जाणार होते.