शेतीसाठीचा पाणीपुरवठा बंद : बेळगाव, संकेश्वर व हुक्केरीसाठी पिण्याचा पाणीपुरवठा : अधिकाऱयांची माहिती
रतिनिधी / संकेश्वर
हिडकल येथील राजा लखमगौडा जलाशयात शुक्रवारी 18.51 टीएमसी पाणीसाठा असून या साठय़ापैकी उपयोगात येणारे पाणी 16.48 टीएमसी इतकेच आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर योग्य करावा, पाण्याचा दुरुपयोग करु नये, असे आवाहन जलाशय अधिकाऱयांनी केले आहे. तथापि यंदा पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नसल्याची माहिती त्यांनी दिली.
गतवर्षी याचदिवशी केवळ 5 टीएमसी पाणीसाठा होता. मात्र यंदा तीनपट पाणीसाठा जलाशयात आहे. शिवाय शेतीला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्यामुळे यापुढे फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच जलाशयातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. सध्या बेळगाव, संकेश्वर व हुक्केरी या तीन शहरासाठीच 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी दररोज 60 क्युसेक पाणीपुरवठा केला जात आहे. तथापि गत पावसाळी हंगामात सर्वच भागात मोठय़ा प्रमाणात अतिवृष्टी होऊन सलग दोनवेळा महापुराची स्थिती प्राप्त झाली होती. त्यामुळे सध्याही बरीचशी शेतजमीन ओलिताखाली आहे. यंदा रब्बी पेरण्याही जोमाने होऊन आहारधान्याचे उत्पादनही वाढले आहे. त्यामुळे शेतीसाठी यंदा पाणीपुरवठय़ाचा अधिकचा ताण जलाशयावर पडलेला नाही. गत दहा वर्षाच्या काळात यंदा प्रथमच 18 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याचे पहिलेच उदाहरण ठरले आहे.
शासनाचाआदेश
अद्यापही शासनाने पाणीपुरवठय़ाच्या दृष्टीने कोणतेच आदेश दिले नाहीत. लाभार्थी ठिकाणापैकी बेळगाव, संकेश्वर व हुक्केरी या शहरांना पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या 48 तासात शासनाने पाणीपुरवठय़ाचा आदेश दिला तर बागलकोट, मुधोळ या भागात पिण्यासाठी पाणीपुरवठा करणार असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली. सध्या कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. यामध्ये कडक उन्हासह अचानक निर्माण होणारे ढगाळी वातावरण, मधूनच येणारा गारवा व दरम्यान वळिवाच्या सरीने विचित्र हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत.
आलमट्टी जलाशयातील पाणी शेतीसाठी बंद
जमखंडी : आलमट्टी जलाशयातील पाण्याचा पुरवठा जूनपर्यंत शेतीसाठी न करता केवळ पिण्याकरिता व अन्य गोष्टींसाठी करण्यात येणार आहे. यामुळे पंपाने उपसा करून पाण्याचा वापर शेतीसाठी करू नये, असा आदेश आलमट्टी कृष्णा भाग्य जलनिगमचे मुख्य अभियंते आर. पी. कुलकर्णी यांनी दिला आहे. सध्या उपलब्ध जलसाठा हा शहर व ग्रामीण भागातील नागरिकांकरिता नळपाणी पुरवठय़ासाठी केला जाणार आहे. जूनपर्यंत पाणी पुरेल या दृष्टीने शेतीकरिता पाणीपुरवठा बंद केला आहे. आलमट्टी जलाशयाच्या पाणलोटात नित्य शेतीकरिता 700 ते 1020 क्मयुसेक्स पाणी उपसा होतो. त्याकरिता हा पाणीपुरवठा स्थगित करून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.