घटप्रभा डाव्या-उजव्या कालव्यांना पाणी : नागरिकांतून समाधान
प्रतिनिधी /संकेश्वर
हिडकल येथील राजा लखमगौडा जलाशयात सोमवार दि. 28 रोजी 24.57 टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी या दिवशी जलाशयात 27.71 टीएमसी पाणीसाठा होता. दरम्यान, सोमवारपासून घटप्रभेच्या डाव्या कालव्याला 2400 क्युसेक आणि उजव्या कालव्याला 2000 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यंदा पाणीपुरवठय़ाच्या नियोजनानुसार अंतिम टप्प्यातील पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले आहे. लाभार्थी भागातील पाण्याचे नियोजन केल्यामुळे आगामी दोन महिन्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही. शेतकरी व नागरिकांनी पाण्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा, पाणी वाया जाणार नाही याची काळजी घेत पाणी बचतीचे धोरण अवलंबावे, असे आवाहन येथील अधिकाऱयांनी केले आहे.
बेळगाव, संकेश्वर व हुक्केरी शहराला पाणीपुरवठा योजनेतून प्रत्येकी 60 क्युसेक पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थी भागात पाणीटंचाईच्या तक्रारी निकालात निघाल्या आहेत. आगामी आठवडाभरात मागणीनुसार सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असल्याचेही अधिकाऱयांनी सांगितले. तसेच तालुक्यातील हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी, मार्कंडेय या नद्यांना मुबलक पाणी आहे. यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवणार नसल्याचेही अधिकाऱयांनी सांगितले.
पाण्याची बचत करणे आवश्यक
दरम्यान, गतवषी पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे नद्यांना मुबलक पाणी आहे. तसेच जलाशयातही चांगला पाणीसाठा आहे. यामुळे यंदा पाणीटंचाई भासणार नाही. असे असले तरी नागरिकांनी शेती किंवा पिण्यासाठी वापरताना बचत करणे आवश्यक आहे.