राहणीमान न बदलल्यास कोरोनासारख्या अनेक महामारी झेलाव्या लागणार
कोविड-19 महामारीच्या या काळात पूर्ण जग त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. अशा स्थितीतच असे अनेक विषाणू जगात महामारी निर्माण करण्यासाठी तयार आहेत. या विषाणूंना सामोरे जाण्यासाठी संपूर्ण लस विकसित करण्याची गरज ओळखून त्या दिशेने वैज्ञानिकांनी संशोधनही सुरू केले आहे. माणसाने राहणीमान न बदलल्यास अशा अनेक घातक विषाणूंना तोंड द्यावे लागू शकते, असे उद्गार मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटीचे प्रमुख डॉ. ए.एम. देशमुख यांनी काढले आहेत.
हे विषाणू मानवी जीवनात येण्यास उत्सुक नाहीत, तर त्यांना येण्यासाठी आपणच प्रवृत्त करत आहोत. त्यांचे स्रोत अनेक असू शकतात, परंतु सर्वात मोठा स्रोत हिमखंड असून त्यांचे सातत्याने वितळणे धोका वाढवत आहेत. हिमखंड वितळण्यासह शतकांपासून त्याच्यात गाडले गेलेले विषाणू आणि जिवाणू बाहेर येऊ शकतात.
माणूस आणि विविध प्रकारचे जीवाणू/विषाणू सहअस्तित्वात आहेत. आमच्यादरम्यान उंदरा-मांजराचा खेळही दीर्घकाळापासून सुरू आहे. अँटीडॉट्स, औषधे किंवा लस विकसित करताच हे सुक्ष्मजीव माणसाला संक्रमित करण्यासाठी नव्या पद्धती विकसित करतात.
अलास्काच्या टुंड्रा क्षेत्रात दफन करण्यात आलेल्या मृतदेहांमध्ये वैज्ञानिकांना 1918 च्या स्पॅनिश फ्ल्यू विषाणूच्या आरएनएचे अवशेष मिळाले आहेत. बुबोनिक प्लेगचे संक्रमित अवशेषही सायबेरियातील बर्फात गाडले गेले असल्याचे अनेक वैज्ञानिकांचे मानणे आहे. 2015 मध्ये वैज्ञानिकांच्या पथकाने तिबेटमध्ये अनेक अज्ञात विषाणू समुहांचा शोध लावला होता. नासाच्या वैज्ञानिकांनी अलास्कामध्ये 30 हजार वर्षांपासून गोठलेल्या जिवाणूला वेगळे करण्यास यश मिळविले आहे. सुक्ष्मजीव ज्याला कार्नोबॅक्टेरियल प्लीस्टोकेनियम म्हटले जाते, हे हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहेत. हिमखंड वितळल्याने केवळ समुद्राची पातळी वाढत असून मानवावरील घातक छायाही आम्ही ओढवून घेत आहोत, असे देशमुख म्हणाले.
कोरोना संक्रमणादरम्यान टाळेबंदी लागू असेपर्यंत कर्बवायूचे उत्सर्जन कमी झाले. यामुळे जागतिक तापमानवाढीवर बऱयाचअंशी प्रभाव पडला आहे. परंतु हे आम्ही हतबल झालो म्हणून हे घडले आहे. मानवी राहणीमानात किंचित बदल केल्यास आगामी पिढय़ांना उत्तम जीवन प्राप्त होऊ शकते.
कोरोना विषाणूने मानवाला एक महत्त्वाचा धडा दिला आहे. हवामान बदलामुळे हिमखंडांचे वितळणे रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत रहावे लागणार आहेत. या मुद्दय़ावर व्यापक सामाजिक आंदोलन आणि सहकार्य करण्यासाठी लोकांना संवेदनशील व्हावे लागणार आहे. सरकारांवर पर्यायी धोरणे लागू करण्यासाठी दबाव आणावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.