वयाच्या 87 व्या वर्षी निधन : दोनवेळा कोरोना विषाणूची लागण
वृत्तसंस्था /शिमला
हिमाचल प्रदेशचे 6 वेळा मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेस नेते वीरभद्र सिंग यांचे वयाच्या 87 व्या वर्षी गुरुवारी निधन झाले आहे. गुरुवारी पहाटे 3.40 वाजता त्यांनी शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. मागील दोन महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी श्वसनावेळी त्रास जाणवू लागल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
वीरभद्र यांना दोनवेळा कोरोनाची लागण झाली होती. 12 एप्रिलला पहिल्यांदा तर 11 जून रोजी दुसऱयांदा त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. वीरभद्र यांचा जन्म 23 जून 1934 रोजी झाला होता. 1962 मध्ये वीरभद्र यांनी पहिल्यांदा महासू लोकसभा मतदारसंघात विजय मिळविला होता. त्यानंतर 1967, 1971, 1980 आणि 2009 मध्ये देखील ते लोकसभेवर निवडून गेले होते. वीरभद्र हे रोहडू मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवायचे. रोहडू मतदारसंघ राखीव झाल्यावर त्यांनी 2012 मध्ये शिमला ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. 2017 मध्ये त्यांनी हा मतदारसंघ पुत्रासाठी सोडत स्वतः अर्की मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.
केंद्रीय मंत्रिपदही भूषविले
वीरभद्र सिंग यांनी 1983 पासून 1985 पर्यंत पहिल्यांदा, 1985 ते 1990 पर्यंत दुसऱयांदा, 1993-1998 पर्यंत तिसऱयांदा, 1998 मध्ये काही दिवसांसाठी चौथ्यांदा, 2003-07 पर्यंत पाचव्यांदा आणि 2012-17 पर्यंत सहाव्यांदा मुख्यमंत्रिपद भुषविले होते. संपुआ सरकारमध्ये ते केंद्रीय पोलाद मंत्री देखील राहिले होते. त्यांच्याकडे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा पदभार देखील होता.