ऑनलाईन टीम / शिमला :
जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या सफरचंदाच्या सिझनसाठी बाहेरच्या राज्यातून सफरचंदांची खरेदी करण्यासाठी येणाऱ्या व्यवसायिकांना पाच दिवस क्वारंटाइन केल्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. त्यांच्या टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना फळ मार्केटमध्ये व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिला जाणार आहे, अशी माहिती शिमलाचे उपायुक्त अमित कश्यप यांनी दिली.
तसेच बाहेरील राज्यातून येणारे आणि ज्यांनी स्वतःची कोरोना टेस्ट करून घेतली असेल अशा व्यापारांचे कोरोना टेस्टचे रिपोर्ट तपासूनच त्यांना मार्केटमध्ये प्रवेश दिला जाणार आहे, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, सफरचंदाच्या सीझनमध्ये सफरचंदाची खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि उत्तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणात शिमल्यात व्यापारी येतात. सध्या महाराष्ट्र आणि दिल्ली रेड झोन मध्ये आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रदुभाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आल्यावरच मार्केटमध्ये प्रवेश दिला जाईल. तसेच प्रशासनाकडून सफरचंद मार्केटमध्ये आरोग्य तपासणीची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. जेणेकरून मार्केटमध्ये रोज येणाऱ्या लोकांची देखील टेस्ट करता येईल.