प्रतिनिधी /बेळगाव
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे नुकतेच एका विवाह समारंभानिमित्त बेळगावला आले होते. यावेळी त्यांनी विनायकनगर येथील लोकमान्य सोसायटीच्या शाखेला भेट दिली.
यावेळी ते म्हणाले, ‘लोकमान्य संस्था राज्य मान्यतेसाठी थांबली नाही.कारण संस्थेला लोकमान्यता लाभली आहे. कोणत्याही सोसायटीमध्ये महत्त्वाची गुंतवणूक असते ती विश्वासार्हता. जेवढा लोकांचा विश्वास तेवढी संस्था विस्तारत जाते. या सोसायटीतर्फे ग्राहकांना विनम्र सेवा दिली जाते. शिवाय कोविड काळात सोसायटीने उत्तम काम केले आहे, हे मी खूप जवळून पाहिले. त्यामुळे लोकांना या संस्थेचा आधार वाटतो’, असे ते म्हणाले.
यावेळी सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. दामोदर वागळे, संचालक अजित गरगट्टी, गजानन धामणेकर, प्रभाकर पाटकर, समन्वयक विनायक जाधव, शाखा व्यवस्थापक किशोर हळदणकर, मकरंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. डॉ. वागळे यांनी स्वागत केले. विनायक जाधव यांनी सूत्रसंचालन केले.