वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2018 साली जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या मिश्र रिले संघाने सुवर्णपदक पटकाविले. भारताच्या मिश्र रिले संघात हिमा दास, मोहमद अनास, एम.आर. फुवम्मा आणि अरोकिया राजीव यांचा समावेश होता. भारताची महिला धावपटू हिमा दासने या स्पर्धेत आपल्याला मिळालेले सुवर्णपदक कोरोना महामारी संकटाशी लढणाऱया पोलीस अधिकारी आणि डॉक्टर्सना समर्पित केले आहे.
जकार्ता येथील आशियाई स्पर्धेत भारतीय मिश्र रिले संघाने 4ƒ400 मी. रिलेमध्ये सुरूवातीला रौप्यपदक मिळविले होते. बहरीनच्या रिले संघाने या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक घेतले होते. दरम्यान बहरीन संघातील धावपटू ऍडेकोया उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने तिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आणि बहरीन संघाचे सुवर्णपदक रद्द करण्यात आले. त्यामुळे या क्रीडा प्रकारात भारतीय रिले संघाला सुवर्णपदक मिळाल्याची घोषणा स्पर्धा आयोजकांनी केली होती. जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 16 सुवर्ण, 23 रौप्य आणि 31 कास्य अशी एकूण 70 पदकांची कमाई केली आहे.