30 जानेवारीच्या मोर्चाकडे सर्वांच्या नजरा निर्णायक लढ्य़ासाठी वज्रमूठीची गरज
हलकर्णी / प्रतिनिधी
हिरा शुगर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्यापासून हंगाम संपेपर्यंत दरवर्षी मळीमिश्रीत दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. कारखाना सुरू होण्यापुर्वी गोटूर बंधाऱयाला फळय़ा घालून पाणी अडविले जाते. सध्या पाण्याचा रंग काळपट होवून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. जॅकवेल शेजारच्या ओढय़ातून सायंकाळनंतर रात्रीच्यावेळी मळीमिश्रीत पाणी मोठय़ा प्रमाणात सोडले जाते असे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एकूणच मळीमिश्रीत पाण्याचा ‘रात्रीस खेळ चाले’ अशीच परिस्थिती आहे.
नांगनूर ग्रामपंचायतीने अनेकवेळा महाराष्ट्रातील संबंधीत कार्यालयाकडे दूषित पाणी प्रश्नी पाठपुरावा केला. अधिकाऱ्यांच्या थेट कार्यालयात जावून पदाधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती कथन केली. मात्र ग्रामपंचायतीच्या पदरी निराशाच आली. येथील सामाजिक कार्यकर्ते शाहू मोकाशी यांनी ‘एकला चलो रे’ या पध्दतीने जिल्हा प्रदूषण मंडळाकडे तक्रार केली. पदरमोड करून कोल्हापूर, मुंबईच्या फेऱ्या मारल्या. पत्रव्यवहार केला. व्हिडीओ पाठविले. अखेर त्यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली. कोरोनाच्या विस्फोटामुळे कामकाज होवू शकले नाही. 18 जानेवारी सुनावणीची तारीख निश्चित झाली होती. जुन्या गोटूर बंधाऱ्यावर ‘ऑन दि स्पॉट व्हिसीची’ जय्यत तयारी केली होती. न्यायालयाने सुनावणीसाठी लिंक पाठविली. फेब्रुवारीमध्ये सुनावणी होणार असल्याचा संदेश याचिकाकर्त्यांना आला. सुनावणीबाबत ‘तारीख पे तारीख’ असाच खेळ सुरू झाला आहे.
शिवसेना जिल्हा प्रमूख विजय देवणे यांनी कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या प्रदुषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. प्रदुषण मंडळाचे अधिकारी यांनी थेट जुन्या गोटूर बंधाऱ्याला भेट देवून नदीतील पाण्याचे नमुने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संकलित केले होते. पाण्याचे नमुने चिपळूण येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. अद्याप त्याचा अहवाल गुलदस्त्यातच आहे. महिना उलटून गेला तरी अहवाल प्रलंबितच आहे.
मध्यंतरीच्या काळात शिवसेनेने ग्रामस्थांना एकत्रीत करून कारखान्यावर मोर्चोचे नियोजन केले होते. मोर्चेची कुणकूण लागताच कार्यकारी संचालक, पर्यावरण अधिकारी, संचालक, ग्रामस्थ, विजय देवणे, रियाजभाई शमनजी यांच्या उपस्थितीत राम मंदिराच्या प्रांगणात बैठक घेतली होती. शिवसेना, ग्रामस्थांनी प्रशासनासमोर दोन पर्याय ठेवले होते. पहिला पर्याय होता तात्काळ बांध घालून नदीत मिसळणारे पाणी अडविणे आणि दुसरा दिर्घकालीन पर्याय व्यवस्था करणे. त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतुद कारखाना प्रशासनाने करणे या आश्वासनानंतर मोर्चा स्थगित केला होता.
ग्रामस्थांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर काही दिवसातच हिरण्यकेशीच्या पाण्याला काळा रंग आला. पाण्याच्या दुर्गंधीत वाढच झाली. शिवसेनेने प्रदुषित पाणी प्रश्नाची लढाई ‘आर या पार’ करण्याचा निर्णय मंगळवारी नांगनूर येथील बैठकीत घेत मोर्चाचे नियोजन करण्याचे निश्चित केले. 30 तारखेला कोणत्याही परिस्थितीत पाणी प्रदूषण करणाऱ्या कारखान्यावर मोर्चा निघणारच असे शिवसेना जिल्हा प्रमूख विजय देवणे यांनी ठासून सांगितले आहे. नांगनूरसह अरळगुंडी, खणदाळ, हिटणी या पाच गावांना प्रदूषित पाण्याचा त्रास होत आहे. शिरोळसारखी परिस्थिती निर्माण होण्यापुर्वीच पंचक्रोशीतील लोकांनी निर्णायक लढ्य़ासाठी वज्रमुठ बांधणे गरजेचे आहे.