मुंबई \ ऑनलाईन टीम
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही केवळ अतिवृष्टी नाही तर अनपेक्षित संकट असल्याचं म्हटलं आहे. गेले चार ते पाच दिवस संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहे, असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रालयात जाऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
गेल्या चार पाच दिवसांपासून मी आढावा घेत आहे. आपल्याला काही शब्दांची व्याख्या बदलावी लागणार आहे. अतिवृष्टीच्या पलीकडे जाऊन पाऊस होत आहेत. या सगळ्या संकटाला आपण सामोरं जात आहोत. काल पंतप्रधानांचा फोन आला होता. त्यांनी सहकार्याचं वचन दिलं आहे मदतकार्य आणि बचावकार्य सुरु आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. जीवितहानी होऊ नये हा प्रयत्न असणार आहे. पुरात अडकलेल्यांना वाचवण्यावर व नदी परिसरातील नागरिकांच्या स्थलांतरावर भर देण्यात येत आहेत. डोंगर उतारावरील लोकांनी स्थलांतर करावे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, कोस्ट गार्ड…एनडीआरएफच्या टीम बचाव कार्य करत आहेत. बचावकार्य सुरु झालेलं आहे. पाऊस काही ठिकाणी थांबतोय तर काही ठिकाणी पडतोय. धरणं आणि नद्या या ओसंडून वाहत आहेत. काही ठिकाणी धरणाचं पाणी सोडावं लागत आहे आणि ते कुठं जाईल ते लक्षात घेऊन तिथल्या नागरिकांना स्थलांतरित करण्याचं काम जोराने सुरु आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, हे सगळं करत असताना कोरोनाचं सुद्धा संकट टळलेलं नाही आणि याचीही कल्पना आपल्याला आहे. हाच तो परिसर आहे जिथे कोरोनाचं संकट आपल्याला चिंताजनक वाटतंय. अशा वेळेला पहिल्या प्रथम जिवीत हानी होऊ न देणं हे महत्त्वाचं काम आहे त्याचा प्रयत्न सुरु आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.