मुंबई/प्रतिनिधी
साकीनाका बलात्कार प्रकरणावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दोन दिवसीय अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. यात राज्यपालांनी राज्यात महिला सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात चर्चा करावी असं म्हटलं होतं. राज्यपालांच्या या पत्राला मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत तुम्ही व्यक्त केलेली काळजी समजू शकतो. साकीका इथं झालेल्या घटनेनंतर आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. तसंच कुटुंबाला न्याया मिळावा यासाठी भूमिका घेतली आहे. दरम्यान, सरकार विरोधी गटामधून विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली गेली. यातच राज्यपाल महोदयांनी सुरात सूर मिसळणे हे संसदीय लोकशाही पद्धतीला मारक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटल होत. आता या प्रकरणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
राज्यपालांच्या पत्रांनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र पाठवल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही अपरिपक्वता असल्याचे म्हटले आहे. राज्यपालांना असे पत्र पाठवताना खातरजमा केली पाहीजे, असे फडणवीस म्हणाले.
“राज्यपालांनी मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या पत्रात शक्ती कायदा लवकर व्हावा अशा प्रकारची मागणी केली आहे. यासाठी दोन दिवस विशेष अधिवेशन बोलावा असे राज्यपाल म्हणाले होते. मात्र राज्यपालांनी हे सुचवले होते, त्यांनी कुठल्याही प्रकारचा आदेश दिला नव्हता. तसेच सरकार कोणतेही असो किंवा कुठलेही राज्यपाल असो, त्यावर अशाच प्रकारचे पत्र पाठवण्यात येत असते. हे मी २५ वर्षापासून पाहत आहे. मात्र या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालयाने अपरिपक्वता दाखवली. सात दिवस संशोधन करुन, वेगवेगळ्या राज्यांची आकडेवरी घेऊन, अशाप्रकारचं पत्र पाठवण्याऐवजी राज्यातील पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले असते आणि शक्ती कायद्यावर लवकर निर्णय करण्याचा विचार झाला असता. तर ते अधिक संवेदनशील दिसलं असतं.”