नागपूर/प्रतिनिधी
देशातील २२ राज्यांमध्ये भाजपकडून जनआशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेत ३९ केंद्रीय मंत्री सहभागी होणार आहेत. यामध्ये मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात समावेश असलेले मंत्री या जनआशीर्वाद यात्रेत सहभागी झाले आहेत. गुरुवारी मुंबई येथून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. यावेळी नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मारकास अभिवादन केले. यांनतर काही तासांतच शिवसेनेतर्फे स्मारकाचे शुद्धीकरण करण्यात आले. यांनतर भाजपकडून शिवसेनेवर टीका केली जात आहे. भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारक शुद्धीकरणाच्या प्रकरणावर बोलताना, ‘ज्यांनी स्मारकाचे शुद्धीकरण केले त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलेली नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे. एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता,’ अशी जहरी टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे.
दरम्यान, जनआशीर्वाद यात्रे दरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मारकास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट देऊन वंदन केल्यानंतर काही तासांतच शिवसेनेतर्फे स्मारकाचे शुद्धीकरण करण्यात आले. या घटनेनंतर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केलं आहे.
‘त्या लोकांना बाळासाहेबांची शिवसेना समजलेली नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे. एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारे नाही,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.