पटना / वृत्तसंस्था
बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या प्रचारतोफा गुरुवारी सायंकाळी थंडावल्या. अंतिम टप्प्यातील अखेरच्या प्रचारादिवशी जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यातील जनतेला भावनिक हाक देत ‘ही आपली शेवटची निवडणूक’ असल्याची घोषणा केली. दरम्यान, शनिवारी तिसऱया टप्प्यात पंधरा जिल्हय़ांमधील 78 मतदारसंघात मतदान होणार आहे. या 78 जागांसाठी 1,207 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
बिहारमधील निवडणुकीच्या रणधुमाळीत आता मतदानाचा अखेरचा टप्पा राहिला आहे. त्यामुळे सर्वच पक्ष जीव तोडून प्रचार करत आहेत. दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मतदारांना भावनिक साद घालत निवृत्तीचे संकेत दिले आहेत. बिहारमधील पूर्णिया जिल्हय़ातील धमधाहा येथे प्रचाराच्या अखेरच्या दिवशी बोलताना नितीश कुमार यांनी 2020 ही त्यांची अखेरची निवडणूक असणार असे सांगितले. ‘हा प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. परवा मतदान आहे. आणि ही माझी अखेरची निवडणूक आहे. अखेर चांगला झाला की सर्वच ठीकठाक होते’, असे नितीशकुमार यांनी सांगितले. अखेरच्या दिवशी त्यांनी पूर्णिया येथे दोन आणि कटिहारमध्ये तीन सभा घेतल्या.
बिहारमधील तिसऱया व अखेरच्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा भाजप-जदयू यांच्यासमोर लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव व राम विलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान या दोन तरुण नेत्यांनी मोठे आव्हान निर्माण केल्यामुळे बिहारमधील मतदारांच्या बाबतीत अंदाज लावणे कठीण झाले आहे. त्यामुळेच कदाचित नितीशकुमार यांनी मतदारांना भावनिक आवाहन केल्याचे मत राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे. दोन दिवसांपूर्वीच नितीशकुमार यांची लोकप्रियता कमी झाल्याचा एक अहवाल पुढे आला होता.