66 वर्षांची धगधगती परंपरा मूक सायकलफेरीतून आजही जिवंत : महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार कायम
प्रतिनिधी /बेळगाव
सीमाभागावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मंगळवारी मराठी भाषिकांकडून भव्य मूक सायकलफेरी काढून भाषावार प्रांतरचनेला विरोध दर्शविण्यात आला. 66 वर्षे झाली तरी लोकशाहीच्या मार्गाने अन्यायाविरोधात लढा दिला जात असून आम्हाला कधी ना कधी न्याय मिळेल ही एकच अपेक्षा घेऊन निःस्वार्थी भावनेने सीमावासियांनी निषेध नोंदविला. ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नही तो जेल में’ असे म्हणत भाषा आणि संस्कृतीच्या जतनासाठी आम्ही जेलमध्ये जायलाही तयार आहे, हे यातून दर्शविण्यात आले.
मागील 66 वर्षांची परंपरा पाळत आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात मंगळवारी सीमावासियांनी कडकडीत बंद पाळला. हजारोंच्या संख्येने सायकलफेरीत सहभागी होत महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार पुन्हा एकदा कायम करण्यात आला. बालचमूंपासून वयोवृद्धांपर्यंत हजारेंच्या संख्येने सीमावासीय या फेरीमध्ये सहभागी झाले होते. महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती. सायकलफेरीचे नेतृत्व महिलांनी केले. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
1 नोव्हेंबर 1956 रोजी केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना केली. त्यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी यासह मराठीबहुल प्रदेश तत्कालीन म्हैसूर प्रांताला जोडला गेला. परंतु मराठी असूनही कानडी प्रांतात जोडण्यात आल्याने तेव्हापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न निर्माण झाला. सीमाभागातील मराठी भाषिकांना त्यांचे भाषिक अधिकार त्यांना मिळावेत यासाठी लढा देत आहेत. परंतु कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर दिवसेंदिवस कानडीकरणाचा वरवंटा अधिकच फिरविला जात असल्यामुळे येथील मराठी जनतेवर अन्याय होत आहे. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असून सीमावासियांच्या बाजूनेच न्यायदेवता न्याय देईल, असा विश्वास सीमावासियांना आहे. जोवर न्याय मिळत नाही तोवर 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळणारच असा निर्धार सीमावासियांनी केला. तेव्हापासून आजतागायत सीमाभागात काळा दिन गांभीर्याने पाळला जात आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने हरताळ पाळण्याची हाक दिली होती. याला प्रतिसाद देत शहरासह शहापूर, अनगोळ, वडगाव परिसरात मराठी भाषिकांनी कडकडीत बंद पाळला.
शहरासोबत ग्रामीण भागातही मंगळवारी शुकशुकाट पसरला होता. सकाळी 8 वाजल्यापासून महाद्वार रोड येथील धर्मवीर संभाजी उद्यान परिसरात सीमावासीय एकवटत होते. काळी वस्त्रs, टोप्या, ध्वज घेऊन दाखल होत होते. शहर म. ए. समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर, सरचिटणीस किरण गावडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्या उपस्थितीत फेरीला सुरुवात झाली.
पं. नेहरूंची चूक मोदींनी सुधारावी
माध्यमांशी बोलताना शहर म. ए. समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर म्हणाले, महाराष्ट्राने लढवय्यी भूमिका न घेतल्यानेच हा सीमाप्रश्न मागील 66 वर्षांपासून खितपत पडला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील नेते दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे हे घोंगडे भिजत पडले आहे. तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरू यांनी केलेली चूक सुधारण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. 1956 पासून काळा दिन गांभीर्याने पाळला जात असून महाराष्ट्राचे याकडे लक्ष नाही. न्यायालयीन लढय़ासोबतच न्यायालयाच्या बाहेरही प्रश्न सोडविला जाऊ शकतो. परंतु महाराष्ट्र मात्र आश्वासनांच्या पलीकडे काहीच करत नसल्याचा घणाघात त्यांनी केला.
सकाळी 10 वाजता फेरीला सुरुवात झाली. सीमाप्रश्नाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, त्याचबरोबर सीमाप्रश्नाचा इतिहास व काळय़ा दिनाच्या सायकलफेरीची शिस्त यांची माहिती देण्यासाठी मूकफेरीच्या अग्रभागी रिक्षा होती. समितीचे कार्यकर्ते महादेव पाटील फेरीत सहभागी सीमावासियांना माहिती देत होते.
महाद्वार रोड येथून तानाजी गल्ली रेल्वेगेट, भांदुर गल्ली, हेमुकलानी चौक, मुजावर गल्ली, कोनवाळ गल्ली, ताशिलदार गल्ली, फुलबाग गल्ली, पाटील गल्ली, कपिलेश्वर ओव्हरब्रिज, एसपीएम रोड, शहापूर-खडेबाजार, महात्मा फुले रोड, बसवेश्वर सर्कल येथून रेल्वेओव्हरब्रिज येथील मराठा मंदिर परिसरात सायकलफेरीची सांगता झाली. तीन तासांनंतर दुपारी 1 च्या सुमारास मूक सायकलफेरी मराठा मंदिर परिसरात दाखल झाली. तळपत्या उन्हातही हजारोंच्या संख्येने सीमावासीय फेरीत सहभागी झाले होते. फेरीच्या मार्गावर काही मराठी भाषिकांकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, केळी व इतर फळांचे वाटप करण्यात आले.
घोषणांनी दणाणला परिसर
मागील दोन वर्षांत कोरोनामुळे सायकलफेरी काढण्यावर निर्बंध आले होते. परंतु यावषी भव्य प्रमाणात सायकलफेरी काढण्यात आली. युवकांकडून दिल्या जात असलेल्या घोषणांमुळे फेरीचा मार्ग दणाणून निघाला. ‘आमचं ठरलंय, बेळगाव उरलंय’, ‘बेळगावी नव्हे बेळगावच’, ‘बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘बघताय काय सामील व्हा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
लाल-पिवळा ध्वजावर नजर
सायकलफेरी सुरू असताना काही अतिउत्साही कन्नड कार्यकर्त्यांकडून लाल-पिवळा ध्वज घेऊन फेरीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी वेळीच अशा कार्यकर्त्यांना रोखत वातावरण चिघळणार नाही, याची खबरदारी घेतली. तानाजी गल्ली, रेल्वेगेटनजीक काही कार्यकर्ते राज्योत्सवाची तयारी करत होते. त्यावेळी लाल-पिवळा ध्वज घेऊन काही जण सायकलफेरीकडे येत असल्याचे पाहताच पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी व एसीपी नारायण बरमनी यांनी त्या तरुणांना चांगलेच धारेवर धरले. असाच प्रकार आणखी दोन-तीन ठिकाणी घडला. गोवावेस परिसरात लाल-पिवळा ध्वज अथवा शाल घालून कोणीही येणार नाही, याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात होती.
तिरंगा ठरला लक्षवेधी
मूक सायकलफेरीमध्ये एक चिमुकला हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाला होता. कर्नाटक राज्य सरकारकडून आम्हाला दुय्यम वागणूक दिली जात असली तरी आम्हीही देशातीलच नागरिक आहोत, आम्हालाही आमचा हक्क मिळाला पाहिजे, अशा भावनेने तो चिमुकला हातात तिरंगा ध्वज घेऊन संपूर्ण फेरीमध्ये सहभागी झाला होता. याचबरोबर भगवे व काळे ध्वज डौलाने फिरविले जात होते.
9 महिन्यांचा स्वरांशही होता सहभागी
मागील 66 वर्षांपासून सीमाप्रश्न खितपत पडला आहे. मात्र, बेळगाव येथील जनता आजही या प्रश्नासाठी पिढय़ान्पिढय़ा लढा देतच आहे. युवा समितीचे उपाध्यक्ष सचिन केळवेकर हे आपल्या 9 महिन्यांचा मुलगा स्वरांश याच्या सोबत सायकलफेरीमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे सीमालढय़ात चौथी पिढीही सक्रिय होईल, असा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या सायकलफेरीमध्ये माजी महापौर किरण सायनाक, शिवाजी सुंठकर, सरिता पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, वर्षा भातकांडे, रवी साळुंखे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील, ता. पं. माजी सदस्य सुनील अष्टेकर, कृष्णा हुंदरे, आर. आय. पाटील, प्रेमा मोरे, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, राजू बिर्जे, मनोहर हलगेकर, एस. एल. चौगुले, मनोज पावशे, नारायण किटवाडकर, बाळासाहेब काकतकर, नेताजी जाधव, राजकुमार बोकडे, दिलीप बैलूरकर, अंकुश केसरकर, रमाकांत कोंडुस्कर, चंद्रकांत कोंडुस्कर, संजय मोरे, सुहास किल्लेकर, अजित कोकणे, सतीश गावडोजी, सुधीर कालकुंद्रीकर, संजय सातेरी, अजय सातेरी, ऍड. महेश बिर्जे, सुनील बाळेकुंद्री, बापू जाधव, मदन बामणे, ऍड. अमर यळ्ळूरकर, ऍड. सुधीर चव्हाण, दत्ता उघाडे, गणेश दड्डीकर, रणजीत चव्हाण-पाटील, रेणू मोरे, शंकर भातकांडे, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख हणमंत मजुकर, प्रकाश राऊत, प्रवीण तेजम, राजू तुडयेकर, साईनाथ शिरोडकर, श्रीकांत कदम, सचिन केळवेकर, येळ्ळूर ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील, सदस्य रमेश मेणसे, शिवाजी नांदुरकर, परशराम परीट, दयानंद उघाडे, राकेश परीट, प्रमोद पाटील, किसन सुंठकर यासह हजारोंच्या संख्येने सीमाबांधव उपस्थित होते.