अनेक घरांमध्ये शिरले पाणी : कोटय़वधींचे नुकसान : एकजण गेला वाहून
विशेष प्रतिनिधी/ हुक्केरी
शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसानंतर रविवारी शहरात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजला. अचानक सुरु झालेल्या या पावसाने जुन्या बसस्थानक परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरुन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच पुराच्या पाण्यात एकजण वाहून गेला असून रविवारी रात्रीपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. चुकीच्या पद्धतीने शहरातील गटारींचे काम झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली असून नगरपरिषदेच्या गलथान कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात दिवसभर उष्णता तसेच दुपारनंतर पावसाचे वातावरण होत होते. यातच शनिवारी सायंकाळी शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. याचवेळी अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे नागरिकांना मोठा फटका बसला होता. यातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच रविवारी सायंकाळी 4.30 नंतर शहरात ढगफुटीसदृश पाऊस सुरू झाला. अवघ्या तासाभरातच जुन्या बसस्थानकानजीकच्या नाल्यातून तसेच गजबरवाडी रोडवर पूरस्थिती निर्माण झाली. यात 60 ते 65 वर्षीय व्यक्ती वाहून गेली.
तसेच एक कार व दुचाकीदेखील वाहून गेली असून 30 हून अधिक घरांमध्ये तब्बल 6 फुटापर्यंत पाणी शिरले होते. यात संसारोपयोगी साहित्यासह टीव्ही संच, फ्रिजसह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्या. तसेच शहरातील भोई गल्ली, बसवनगर, मोसळीकारंजी, मासापीकारंजी, जुन्या बसस्थानक परिसरातील औषध दुकाने, हॉटेल, गोडावून आदी सर्वच भागात ढगफुटीसदृश पावसाने पूरस्थिती निर्माण झाली.
रविवारी रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरुच होता. त्यामुळे शहरात कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. व्यावसायिकांनाही या पावसाने लाखो रुपयांचा फटका बसल्याचे दिसून आले. या सर्व नुकसानीचा तत्काळ सर्व्हे करून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
पूरस्थितीला प्रशासन जबाबदार
शहरातील जुन्या बसस्थानकासह अनेक ठिकाणी गटारी व नाल्याचे बांधकाम अवैज्ञानिक पद्धतीने झाले आहे. रस्त्यापेक्षा गटारीच उंच झाल्या आहेत. गेल्यावर्षीही अशा प्रकारे पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. यानंतर या नियोजनशून्य कामाबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यानंतरही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांना नुकसान सोसावे लागले आहे. त्यामुळे या पूरस्थितीला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.