कत्ती-जारकीहोळी गटाचे वर्चस्व अबाधित : निवडणूक होण्याचा अंदाज ठरला फोल
वार्ताहर/ हुक्केरी
एकेकाळी तालुक्यासह जिल्हय़ात चर्चेचा विषय असणारी व यापूर्वी अनेकदा चुरशीने झालेली हुक्केरी तालुका ग्रामीण विद्युत सहकारी संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक रविवारी बिनविरोध झाली. गेल्या काही दिवसातील चित्र पाहता निवडणूक होणारच असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र शेवटच्या टप्प्यात तडजोडीच्या भूमिकेतून निवडणूक बिनविरोध करण्यात नेतेमंडळींना यश आले. तसेच सदर विद्युत संघावर कत्ती व जारकीहोळी गटाचे वर्चस्व अबाधित राहिले.
निवडणुकीसाठी 9 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. शनिवार 17 पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी एकूण 15 जागांपैकी राखीव असलेल्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, मागासवर्गीय अ, मागासवर्गीय ब व दोन महिला या गटात प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने शनिवारीच राखीव गटातील 6 जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित सामान्य गटातील 9 जागांसाठी 20 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. रविवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत होती.
यावेळी सकाळी 11 वाजताच 20 पैकी 11 जणांनी अर्ज माघार घेतले होते. तर हेब्बाळ येथील बाबागौडा पाटील हे निवडणूक लढविण्यावर ठाम होते. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात एका जागेसाठी निवडणूक लागण्याची शक्यता होती. मात्र निवडणुकीसाठी सुमारे 40 लाख रुपये इतका खर्च येणार असून हे लक्षात घेऊन अर्ज माघार घेत सहकार्य करण्याची विनवणी नेतेमंडळींनी केल्यानंतर बाबागौडा पाटील यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात निवडणूक बिनविरोध झाली.
त्यानुसार सामान्य गटातून लव रमेश कत्ती, अशोक बसाप्पा चंदापगोळ, जोमलिंग बसाप्पा पटोळी, कलगौडा बसगौडा पाटील, कुणाल शिवगौडा पाटील, जयगौडा शिवगौडा पाटील, बसगौडा पराप्पा मग्गेण्णावर, रवींद्र बसवंत हिडकल, शशिराज बापूसाहेब पाटील यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. ओबीसी अ वर्गातून केंचप्पा बेनचीनमरडी, ओबीसी ब वर्गातून विष्णू भरमा रेडेकर, एससी वर्गातून रवींद्र शंकर असोदे, एसटी गटातून इरप्पा रुद्रप्पा बंजीराम तर महिला गटातून संगीता शिवराई धप्पाधुळी व शिवलिला लगमण्णा मणगुत्ती यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक पार पडल्यानंतर बोलताना माजी खासदार व बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती म्हणाले, आमदार उमेश कत्ती व आमदार सतीश जारकीहोळी यांच्यासह अन्य नेतेमंडळींच्या सहकार्यामुळे सदर निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले आहे. सहकार क्षेत्रात राजकारण आपण कधीही करणार नाही. यापूर्वी विद्युत संघाच्या माध्यमातून राजीव गांधी निरंतर योजना, दिनदयाळ वीज योजना तसेच शेतीवाडीतही वीज योजना राबविण्यात आली आहे, असे सांगितले.