शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्त्यांना आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
कन्नडसक्ती विरोधातील आंदोलनात 9 जणांना हौतात्म्य प्राप्त झाले. 1986 पासून कन्नडसक्ती तीव्रतेने मराठी भाषिकांवर लादण्यात येत आहे. या कन्नड सक्तीविरोधात बलिदान दिलेल्या सीमावासियांना विसरून चालणार नाही. त्यांना अभिवादन करण्यासाठी बुधवार दि. 1 जून रोजी सकाळी 9 वा. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे उपस्थित रहावे, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस किरण गावडे यांनी केले.
सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सीमाभागात दररोज होणाऱया अन्यायामध्ये वाढ होत आहे. यामुळे मराठी भाषिक त्रस्त झाले असून, त्यांना यातून मुक्तता मिळणे गरजेचे आहे. जोवर सीमाप्रश्नाचा निकाल लागत नाही तोवर संपूर्ण सीमाभाग केंद्रशासित करावा. यामुळे मराठी भाषिकांवर होणारे अन्याय-अत्याचार कमी होतील. आज प्रत्येक कार्यालयात सरकारी कागदपत्रांमध्ये कन्नडभाषेची सक्ती करण्यात आली आहे. मराठी युवकांवर विनाकारण गुन्हे घातले जात आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी रस्त्यावरच्या लढाईशिवाय पर्याय नाही.
त्यामुळे मराठी भाषिकांनी हुतात्मादिनाच्या निमित्ताने आपली ताकद दाखवून द्यायची आहे. हुतात्मादिनाच्या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, दक्षिण विभागप्रमुख सुधा भातकांडे, वर्षा आजरेकर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, माजी महापौर सरिता पाटील यांनी केले आहे.
हिंडलगा हुतात्मा स्मारक येथे अभिवादन : हक्कांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱयांना उद्या देणार निवेदन
कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात सीमावासियांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन महाराष्ट्रात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. हीच इच्छा आजही प्रत्येक सीमावासियांच्या मनात असून, ज्यांनी बलिदान दिले त्यांना बुधवार दि. 1 जून रोजी सकाळी 8.30 वा. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शहर म. ए. समितीच्या बैठकीत सोमवारी करण्यात आले.
रंगुबाई भोसले पॅलेस येथे झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील नेते शरद पवार, जयंत पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासोबत सीमाप्रश्नासाठी झालेल्या चर्चेचा वृत्तांत दीपक दळवी यांनी कार्यकर्त्यांना सांगितला. या पुढील काळात शांततेने व एकीने लढण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील नेतेमंडळी बेळगाव भेटीवर येणार असून यावेळी सर्वसामान्यांना त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडण्याची संधी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यासाठी उपस्थित रहा
हुतात्मादिनाच्या कार्यक्रमानंतर भाषिक अल्पसंख्याक आयोगाने दिलेल्या हक्कांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी मोठय़ा संख्येने नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. मदन बामणे, महादेव पाटील, अमित देसाई, मोतेश बार्देशकर, रणजित हावळाण्णाचे, प्रकाश मरगाळे यांनी आपले विचार मांडले. यावेळी मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.